पारदर्शकता आणण्यासाठी कृषी खात्याचा निर्णय, 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांना आर्थिक प्रोत्साहन मिळावे यासाठी राबविण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आता ई-केवायसी करणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱयांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. दरम्यान लाभार्थ्यांनी ग्राम वन कार्यालयात किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
अल्पभूधारक शेतकऱयांना शासनाकडून प्रतिवषी 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयाप्रमाणे 3 टप्प्यात ही रक्कम जमा केली जाते. विशेषतः शेतकऱयांच्या थेट बँक खात्यात निधी वर्ग केला जातो. मात्र या योजनेसाठी अनेकांनी खोटी माहिती पुरवून लाभ घेतला आहे. शिवाय एकाच कुटुंबातील दोन-तीन सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा बेकायदेशीर लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी खात्याने ई-केवायसीचे काम हाती घेतले आहे.
लाभार्थ्यांची ई-केवायसी झाल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध होणार आहे. शिवाय त्यांचा आधार नंबरदेखील लिंक होणार आहे. त्यामुळे कृषी खात्याला पात्र शेतकऱयांची संख्या समजण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना यापुढे निधी दिला जाणार नाही. शिवाय बेकायदेशीर लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना यापुढे दणका बसणार आहे.
जानेवारी दरम्यान दिलेला हप्ता अद्याप बऱयाच शेतकऱयांना मिळाला नाही. जिल्हय़ातील बरेच शेतकरी या हप्त्यापासून वंचित आहेत. पात्र शेतकऱयांची फेरपडताळणी सुरू असून लवकरच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे.
लाभार्थींनी तातडीने ई-केवायसी करावी
किसान सन्मान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी हाती घेण्यात आली आहे. पात्र शेतकऱयांना या योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश आहे. लाभार्थी शेतकऱयांनी तातडीने ई-केवायसी करावी.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)