प्रतिनिधी/ वास्को
उमेदवार गोव्याचा की बाहेरचा हे मला लागत नाही. चांगले काम करणारा माणूस आज कुठ्ठाळीला हवा आहे. सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले हाच तो चांगला अन् अनुभवी माणूस असून लोकांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करीत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुन्हा एकदा कुठ्ठाळीच्या भाजपा उमेदवारीसाठी गिरीष पिल्ले यांच्या नावावर जोर दिला आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी कुठ्ठाळीच्या उमेदवारीबाबत माझे मत बदलणार नाही असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.
झुआरीनगर उपासनगर भागात बुधवारी जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ मंत्री माविन गुदिन्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुदिन्हो यांनी पुन्हा एकदा सरपंच गिरीष पिल्ले हेच कुठ्ठाळीसाठी योग्य उमेदवार असल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले की कुठ्ठाळीत मागच्या चार वर्षांत कामे झालेली नाहीत. कुठ्ठाळीला काम करणारा, चांगला अन्भवी माणूस हवा आहे. सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले हाच योग्य माणूस असून ते गोरगरीबांची कामे करीत आहेत. उमेदवार म्हणून गिरीष हाच योग्य माणूस असल्याचा माझा राजकारणातील अनुभव आहे. लोकांनी त्याच्यामागे राहायला हवे. मदत करायला हवी. माझे पूर्ण सहकार्य राहिल असे सांगून त्यांना पाठींबा द्या, निवडून आणा, तुम्हा लोकांची ही जबाबदारी आहे असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी उपासगरात केले. गिरीष पिल्ले यांच्यावरील लोकांचे प्रेम मला उघडपणे दिसत आहे. त्यांना झुआरीनगर, कुठ्ठाळी, केळशी, कासावली, वेलसाव अशा भागातूनही लोकांचा पाठींबा आहे.
कितीही दबाव आला तरी माझे मत बदलणार नाही
आज गोव्यात आतला व बाहेरचा या विषयावर बराच वादविवाद होऊ लागलेला आहे. मात्र, मला आतला व बाहेरचा लागत नाही. यापूर्वी मीच निकोलस फर्नांडिस या मुळ गोव्याबाहेरील पंचाला सांकवाळचा उपसरपंच बनवले होते. कमला प्रसाद यादव यांना चिखलीचे उपसरपंच मीच बनवले आहे. आम्ही सर्वांचीच कामे करतो. लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. हाच विचार पुढे नेण्यासाठी गिरीष पिल्ले यांना पाठींबा द्यायला हवा. कुठ्ठाळीच्या भाजपा उमेदवारीच्या विषयावर माझ्यावर कितीही दबाव आला तरी माझे मत बदलणार नाही असेही मंत्री माविन गुदिन्हे यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले. यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी विकासाच्या प्रश्नावर आणि कलाभवनाच्या प्रश्नावर माजी आमदार एलिसना साल्ढाना यांच्यावर टीका केली. जो प्रकल्प आपल्या काळात एwशी टक्के पूर्ण झाला होता. तोसुध्दा साल्ढाना यांना पूर्ण करता आला नाही. या प्रकल्पाचे त्यांनी पांढऱया हत्तीत रूपांतर केल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, सरपंच गिरीष पिल्ले, सांकवाळ पंचायतीचे पंच, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वंभर भेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. उपासनगर ते झुआरीनगरपर्यंतच्या जलवाहिनीच्या कामासाठी जवळपास साठ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून हे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.