शहरवासीयांमध्ये नाराजी
प्रतिनिधी / कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गाचे कुडाळ शहरातील काम लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आल्यानंतर ते घिसाडघाईने सुरू आहे. हे काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून कंपनीच्या अभियंत्यांचे लक्ष वेधले. जेथे दरवर्षी पाणी साचते, तेथेच महामार्ग उंचीने कमी करण्यात येत आहे. तसेच पाणी निचरा होण्यासाठी मार्गच केलेला नाही. कामाचा दर्जा पूर्वीसारखा नसल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुरुवातीला झाराप ते पिंगुळी या दरम्यानचे काम करताना कंपनी कामाच्या दर्जाकडे व रस्त्याच्या पातळीकडे लक्ष देत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे कुडाळ शहरातील काम बंद पडले. आता काम सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर कामाची प्रत, दर्जा, उंच-सखलपणा आदी गोष्टींकडे कंपनी दुर्लक्ष करीत आहे. पाऊस जवळ आल्याने काम उरकण्यासाठी ही धावपळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे काम योग्य दर्जाचे होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. याबाबत कुडाळवासीय लवकरच प्रांताधिकाऱयांचे लक्ष वेधणार आहेत.