अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांची फरफट : बसफेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बससेवेचे तीनतेरा वाजल्याने विद्यार्थीवर्ग हैराण झाला आहे. मंगळवारी कुदेमनी येथील विद्यार्थ्यांनी यंदे खूट बसथांब्यावर बस अडवून आंदोलन छेडले. दरम्यान कुदेमनी गावाला बसफेऱया वाढवा, अन्यथा बस पुढे जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. दोन तास बस अडवून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले.
लॉकडाऊनपासून बंद असलेली काही गावांची बससेवा अद्याप बंदच आहे. तर काही ठिकाणी अनियमित व अपुरी बससेवा पुरविली जात आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कुदेमनी गावाला एकच बस आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसच्या पायरीवर थांबून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी एक विद्यार्थी बसमधून पडून जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे कुदेमनीला दोन बस सोडाव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी जोर लावून धरली होती.
कुदेमनी गावातील 200 हून अधिक विद्यार्थी कॉलेजसाठी दररोज बेळगावला ये-जा करतात. मात्र बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. बसची वाट पहात तासन्तास थांबावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे भरपावसामध्ये भिजतच विद्यार्थ्यांना बसची वाट पहावी लागत आहे. बसच्या फेऱया कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा-महाविद्यालयाला आल्यानंतर घरी जाऊन अभ्यास करावा लागतो. मात्र बस वेळेत नसल्याने रात्री 8 वाजता विद्यार्थी घरी पोहोचत आहेत.
कुदेमनी गावाला दिवसातून केवळ चारच फेऱया होत असल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. याबाबत कित्येकवेळा परिवहनकडे तक्रारी देऊनदेखील बसफेऱया वाढविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काही विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी रात्रीपर्यंत थांबावे लागते. त्यांना मोठा फटका बसत आहे. एकूणच बसफेऱयांच्या आणि परिवहन मंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांची फरफट होताना दिसत आहे. त्यामुळेच संतापून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बस अडवून आंदोलन छेडले
प्रवासातच आमचा वेळ वाया
कॉलेजच्या शिक्षणासाठी सकाळी 8 वा. घरातून बाहेर पडतो. मात्र बसफेऱया कमी असल्याने धोकादायक प्रवास करत रात्री उशिराने घरी परतावे लागते. याचा परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे. कारण प्रवासातच आमचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे अभ्यास करणे कठीण जात आहे.
– लक्ष्मण लोहार (विद्यार्थी)
पायरीवर थांबून लोंबकळतच प्रवास सुरू
विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पायरीवर थांबून लोंबकळतच प्रवास सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. गावाला एकच बस असल्याने त्या बसमधून प्रवास करण्यासाठी काही तास चुकवूनच यावे लागत आहे. कुदेमनी गाव हे महाराष्ट्र व्याप्त आहे. दुसऱया कोणत्याच वाहनाची आम्हाला सोय नाही. त्यामुळे आमची ही समस्या सोडवावी.
– दीक्षा धामणेकर (विद्यार्थिनी)