पंतप्रधान मोदींचे विधान : आत्मनिर्भर भारताची हीच मोठी शक्ती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक युवा दिनानिमित्त एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. युवांचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय आवश्यकता आहे. आत्मनिर्भर भारताची सर्वात मोठी शक्ती देखील आहे. 6 वर्षांमध्ये रचला गेलेला पाया, नव्या संस्था यांचा योग्य वापर करत आम्हाला नव्याने ‘स्किल इंडिया’ला वेग द्यावा लागणार असल्याचे मोदी म्हणाले.
जगाला स्मार्ट आणि कुशल मनुष्यबळ भारत पुरविणार हा दृष्टीकोन स्वीकारूनच आमच्या तरुणाईचा कौशल्य विकास घडवून आणला जावा. याचाच विचार करून ग्लोबल स्किल गॅपचे मॅपिंग केले जात असून हे प्रशंसनीय पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
अर्निंगदरम्यान लर्निंग थांबू नये हे आजच्या काळात आवश्यक आहे. कुशल व्यक्तीच आता स्वतःची प्रगती करू शकेल असे उद्गार मोदींनी काढले आहेत. देश कोरोनाविरोधात प्रभावीपणे लढाई लढण्यामागे आमच्या कुशल मनुष्यबळाचे महत्त्वाचे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनीही कौशल्यावर भर दिला होता. स्किल इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत असे मोदी म्हणाले. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेद्वारे आतापर्यंत 1.25 कोटींहून अधिक युवांना प्रशिक्षण मिळाले असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.