लोकसभा निवडणुकीत भाजपची सरशी- तृणमूलसाठी धोक्याची घंटा
कूचबिहारमध्ये विजय-पराभव निश्चित करणारा विशेष घटक राजवंशी समुदायाला आकर्षित करण्यात तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजप अधिक यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे विजय मिळविला होता. भाजपला येथील 9 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 ठिकाणी आघाडी मिळाली होती. 2016 च्या निवडणुकीत तृणमूलने 8 जागा जिंकल्या होत्या. तर एक जागा फॉरवर्ड ब्लॉकला मिळाली होती. भाजपने स्वतःची कामगिरी सुधारावी याकरता राजवंशी समुदायाला स्वतःसोबत घेण्याचे प्रयत्न केले असून यात यश येताना दिसून येत आहे.
येथील राजवंशी समुदाय येथे राहत असलेल्या घुसखोरांना हाकलण्यासाठी एनआरसीची मागणी करत आहे. तर भाजप हा एकमेव पक्ष एनआरसीचा पुरस्कर्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत विशेषकरून या भागात एनआरसीचा मुद्दा अत्यंत नियोजित आणि प्रभावीपणे प्रचारात मांडला जात आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे अन्य नेते असदुद्दीन ओवैसी यांना आता थेट भाजपचा हस्तक ठरवू लागले आहेत. तृणमूलने राजवंशी समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी ही भूमिका स्वीकारली आहे. पण तृणमूलच्या या भूमिकेचा भाजपलाच अधिक लाभ होत आहे.
जात-संस्कृती-भाषेची अस्मिता तसेच ऐतिहासिक प्रतिष्ठेचा दाखला देत तृणमूल आणि भाजप दोघेही या समुदायाला आकर्षित करू पाहत आहेत. या भागात ‘ग्रेटर कूचबिहार राज्या’बद्दल सहानुभूती दाखवत आश्वासनांचा वर्षाव करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘नारायणी सेना’ स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निमलष्करी दलात नारायणी सेना बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच याच्या प्रशिक्षण केंद्राचे नाव वीर चीला रॉय यांच्या नावावर असेल, जे राजवंशी समुदायाच्या इतिहासातील मोठे व्यक्तिमत्व आहेत. ममता सरकारने या समुदायातील दिग्गज व्यक्तिमत्व ठाकुर पंचानन वर्मा यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन केले आहे. 28 ऑगस्ट 1949 रोजी कुचबिहार संस्थान भारतात सामील करण्याचा करार झाला होता. चुकीच्या पद्धतीने कूचबिहार राज्याला पश्चिम बंगालमध्ये जिल्हय़ाच्या स्वरुपात सामील करण्यात आल्याचा दावा ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचा आहे. ग्रेटर कूचबिहार राज्याच्या मागणीचा हाच आधार आहे. यावरून तेथे आंदोलनही होत राहिले आहे