आमदार सुधीर गाडगीळ; पद्माळे येथून सुरवात
सांगली / प्रतिनिधी
कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. पद्माळे ( ता. मिरज ) येथून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या यात्रेस सुरवात करण्यात आली. शेतकऱ्यांना कृषी विधेयक कायद्यासंदर्भातील माहिती पुस्तिकाही देण्यात आली. आमदार गाडगीळ यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे रावसाहेब ऐतवडे यांनी अत्यंत संक्षिप्त भाषेत मार्गदर्शन केले. या कायद्याबाबत विरोधक गैर अर्थ काढून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश चिटणीस अशरफ वांकर यांनी शेती विधेयक व आंदोलन याबाबत सविस्तर माहिती दिली. आ. गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत आहेत. त्यांच्या अनेक निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला आहे. दरम्यान आ. सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून संपूर्ण सांगली विधानसभा क्षेत्रात हे अभियान राबविले जाणार आहे. बामणोली, बुधगाव, माधवनगर, हरिपूर, बिसुर, खोतवाडी, नांद्रे, वाजेगावसह अन्य ठिकाणी हे अभियान राबवून कृषी विधेयक २०२० हे शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहे हे तेथील शेतकऱ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. यावेळी विलास पाटील, प्रकाश पाटील, मिलिंद पाटील, जयसिंग गुरव, विजय जगदाळे, आदि. भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.