उत्तर प्रदेशातील आग्रा शहराजवळ मानसी गंगा नामक नदी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेमुळे ती निर्माण झाली, अशी मान्यता आहे. त्यामुळे तिचे नाव मानसी गंगा असे पूर्वापारपासून प्रचलित आहे. भाविकांसाठी हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून या नदीचे पाणी आचमनासाठी उपयोगात आणले जाते.
तथापि, आता या नदीचे पाणी प्रतिदिन नवा रंग धारण करताना दिसत आहे. मात्र, हा कोणताही चमत्कार नसून नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱया प्रदूषित द्रव्यांचा परिणाम आहे. आग्रा शहर आणि आसपासच्या भागात औद्योगिकरण वाढल्याने प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात आहे. बऱयाच कारखान्यांनी शुद्धीकरण यंत्रणा बसविलेल्या नसल्याने कारखान्यातून बाहेर पडणारी दूषित द्रव्ये थेट नदीत सोडली जातात. त्यामुळे या नदीचा रंग कधीही हिरवा, कधी दूधासारखा पांढरा तर कधी तांबडा असतो. या प्रदूषणमिश्रीत द्रव्यांमुळे नदीचे पाणी विषारी झाले असून ते आता आचमनासाठी योग्य राहिलेले नाही, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाच्या माऱयामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणारी एक नदी निरुपयोगी ठरण्याचा धोका आहे. प्रशासनाने वेळीच प्रयत्न करून हा सांस्कृतिक वारसा सुरक्षित राखावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.