गावामध्ये तणावाचे वातावरण: 36 जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ वाई
केंजळ (ता. वाई) येथे विनापरवाना बसविलेला छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री स्थानिक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. पुतळा सुरक्षित रित्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आला. गावात अनधिकृतरीत्या पुतळा बसवून तणावाचे वातावरण केल्याप्रकरणी 36 जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी चार जणांना पोलीस कोठडी मिळाली असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायत चौकात भैरवनाथ मंदिरालगत चबुतरा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला. याबाबतची माहिती पोलीस व महसूल प्रशासनास मिळाली. तात्काळ पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तानाजी बुरडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे आदी अधिकारी गावात दाखल झाले. गावातील जेष्ठ नागरीकांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. ज्यांनी पुतळा बसविला आहे त्यांनी तो काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. शासनाची परवानगी घेऊन बसवावा अशी सूचना प्रशासनाने सूचना केली.
त्यावर काही ग्रामस्थ व युवकांनी पुतळा काढून घेण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर दिवसभर ग्रामस्थ व युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोणीही ऐकत नसल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कर्मचाऱयांची ज्यादा कुमुक मागविण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे गावात हजर झाले. त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील जेष्ठ नागरिकांशी पुन्हा चर्चा केली. सामोपचाराने मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी ग्रामपंचायत चौकातून गावकऱयांना हटविले. त्यानंतर पोलिसांनी पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा जेसिबी, ब्रेकर च्या साहाय्याने चबुतरा दूर करून पुतळा सुरक्षित काढण्यात आला. दरम्यान नंतर पुतळा सुरक्षित रीत्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आला.
आज सकाळी गावात पोलिसांनी संचलन केले. दिवसभर गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवजयंती व केंजळ येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज शहरात संचलन केले.