प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील नुकसान आपण पाहत आहोत. अतिवृष्टीमुळे ही दुर्दैवी वेळ आली आहे. आपणाला याचे दुःख वाटत आहे. राष्ट्रपती महोदयांनी आपणास पाहणीसाठी पाठवले आहे. केंद्रीय पथकही येणार आहे. राज्य मदत करत आहेच. केंद्राकडूनही मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी येथे व्यापाऱयांना दिले.
गुहागर येथील आरजीपीपीएलच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर ते चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले. शहरात चिंचनाका येथून त्यांचा ताफा सांस्कृतिक केंद्राच्या दिशेने निघाला असताना ट्रेड सेंटरजवळ त्यांनी स्वतःहून थांबत थांबलेल्या व्यापाऱयांशी संवाद साधला. यावेळी झालेले नुकसान आणि विमा कंपन्यांकडून कागदपत्रांच्या मागणीमुळे होत असलेला त्रास याबाबत माहिती देत निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सारे काही ठीक होईल. आपल्या लोकांचे कधीही भरून येणार नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान पाहताना मलाही खूप दुःख होत आहे. तरीही यातून मार्ग निघेल. मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिक व व्यापाऱयांना मदत करणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल. संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी असल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापारी व नागरिकांना रोखणाऱया सुरक्षारक्षकालाही त्यांनी त्यांना रोखू नको, अगोदरच ते परेशान आहेत, त्यांना बोलू द्या, असे सांगत दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते.
आरजीपीएलच्या हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर राज्यपालांनी कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यपालांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदतकार्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदतकार्य असेच सुरू रहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.
राज्यपालांच्या ताफ्याचा मार्ग बदलला
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बाजारपेठेची पाहणी करण्यासाठी रविवारी आले असताना संतप्त पूरग्रस्तांनी त्यांच्या गाडय़ांचा ताफा ठिकठिकाणी रोखून त्यांना घेराव घातला होता. यावेळी झालेला गोंधळ लक्षात घेऊन राज्यपालांचा बाजारपेठेतून ठरलेला दौऱयाचा मार्ग बदलून उक्ताड पाग बायपासमार्गे चिंचनाका असा करण्यात आला. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त व कडक सुरक्षा यंत्रणा बाजारपेठेमध्ये लावली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोरखंड लावण्यात आला होता.