प्रतिनिधी / सातारा :
शाळा सुरू झाल्या तरी मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांची मानसिकता नाही. तरीही पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेची आहे. ती लस आरोग्याला योग्य, अयोग्य आहे, याचे संशोधन होईल. त्यानंतर केंद्राकडून लस उपलब्ध होताच मुलांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सातारा शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी कोरोनानंतर प्रथमच शाळा सुरू झाल्या आहेत, पण मुलांच्या लसीकरणाचे काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, मुलांना लसीकरण करण्याबाबत देश पातळीवरून अद्याप आदेश आलेले नाहीत.12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे, याबाबत चर्चा आहे, पण निर्णय झालेला नाही. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेची आहे. ती लस आरोग्याला योग्य, अयोग्य आहे, याचे संशोधन होईल मगच निर्णय होईल. पहिल्यांदा 45 वरील वयोगटातील लसीकरण झाले. नंतर 18 वर्षावरील लोकांचे लसीकरण सुरू केले. केंद्राचे आदेश आल्यानंतरच 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होईल. शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.