ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकार ‘कोळसा क्षेत्र खुले करणे: आत्मनिर्भर भारतासाठी नवी आशा’ या संकल्पनेसह व्यासायिक खाणींसाठी 18 जूनला कोळसा खाणींचा लिलाव सुरु करणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून दिली.
याबाबत अधिक माहिती देताना जोशी म्हणाले, 18 जूनला देशात प्रथमच व्यावसायिक कोळसा लिलाव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. कोळसा क्षेत्रासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ ही त्यांची दूरदृष्टी आहे. आपण हे साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहोत याचा मला अभिमान आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाखाली नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियान हाती घेतले आहे, कोळसा क्षेत्रात संरचनात्मक सुधारणांच्या माध्यमातून देशाला आत्मनिर्भर ( कोळसा विषयक सुधारणात आत्मनिर्भर) करण्यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्र सिद्ध झाले आहे.
तसेच कोळसा खाणी लिलाव प्रक्रियेमुळे अतिरिक्त कोळसा उत्पादन होऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेचा मजबूत पाया घातला जाईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन कोळसा क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.