वाकरे / प्रतिनिधी
केंद्र सरकारने साखर उद्योग सावरण्यासाठी आणि ऊसाची एफआरपी व साखर उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी साखरेला प्रतिकिलो ३७ रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी कुंभी कासारीचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ५८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी चेअरमन नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन निवास वातकर होते. नरके यांच्या हस्ते आज सकाळी १० वाजता गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीताचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.
चेअरमन नरके यांनी आगामी गळीत हंगामात कुंभीचे साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून देऊन सहकार्य करावे असे आवाहनG केले. गत हंगामात कारखान्याने ४ लाख ९२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून ६ लाख ३५ हजार साखर पोती उत्पादन केले. गतवर्षी ऊसाची प्रतिटन २९२९ रुपये संपूर्ण एफआरपी उत्पादकांना आदा केल्याचे ते म्हणाले. कुंभीची यावर्षीची एफआरपी प्रतिटन ३११८ रुपये आहे.कारखान्याकडे गत हंगामातील ५ लाख क्विंटल साखर शिल्लक असल्याचे नरके म्हणाले.
केंद्र सरकारने आजच इथेनॉलचे धोरण स्पष्ट केल्याने कुंभी कारखान्याने नवीन धोरणाप्रमाणे इथेनॉल प्रकल्प शासनाकडे मंजुरीला पाठवला असल्याचे नरके म्हणाले. शासनाने या प्रकल्पाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून डीपीआर करून हा प्रकल्प मान्यतेसाठी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगून पुढील हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. गेल्या चार वर्षात साखर उद्योग अभूतपूर्व संकटात सापडला असून मागील हंगामातील शिल्लक साखर ११५ लाख मेट्रिक टन आणि हंगामातील ३०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल.पुढील वर्षाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात १६५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहिल. शिल्लक साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल उत्पन्नाला चालना दिल्याचे ते म्हणाले.सध्या पावसाचे वातावरण असून पावसाची परिस्थिती पाहून ऊस तोडणी देणार असल्याचे ते म्हणाले.
Previous Article‘तारक मेहता …’ फेम ‘या’ कलाकाराला जीवे मारण्याची धमकी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.