उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे एकेकाळचे खंदे समर्थक, सरकारी नोकरी सोडून निवडणुकीची तयारी, पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसरा पर्याय तयार
वार्ताहर /केपे
केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर भाजपवासी झाल्यानंतर केपे मतदारसंघात काँग्रेस पक्ष संपुष्टात आल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक पाहता काँग्रेसच्या तिकिटावर एक नव्हे, तर तीन-तीन उमेदवारांनी दावे केले आहेत.
मागच्या निवडणुकीत अशीच इच्छुक उमेदवारांची गर्दी भाजपमधे पाहायला मिळाली होती. अनेक जण कवळेकर यांच्या विरोधात भाजप तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र शेवटी माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनाच भाजपची तिकीट दिली गेली, तरीही कवळेकर यांचा पराभव करता आला नव्हता. आता कवळेकर हेच भाजपवासी झाले असून तिथेही इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. मात्र कवळेकर सोडून अन्य कोणाला भाजपची तिकीट मिळणे कठीणच आहे आणि भाजप सोडून जिंकून येणेही सोपे नाही. त्यामुळे भाजपमधील गर्दी काही प्रमाणात थंडावली आहे असे म्हणता येते.
मात्र कवळेकर भाजपवासी झाल्याने काँग्रेसमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती काही काळापासून एल्टन डिकॉस्ता यांनी थोडीफार भरून काढली असून त्यांना काँग्रेस तिकिटाचे मुख्य दावेदार मानले जात असताना आता अचानक माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांनी काँग्रेसच्या तिकिटवर दावा केला आहे. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री कवळेकर यांचे खंदे समर्थक राहिलेले अर्जुन वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत निवडणूक लढवण्याची घोषणा करून कवळेकर यांच्या विरोधात बंडच पुकारले आहे. आपण काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू असा दावा वेळीप यांनी केला आहे. यामुळे काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवू पाहत असलेल्या डिकॉस्ता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
वेळीप यांचे वडील कट्टर काँग्रेस समर्थक होते. ते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना जवळचे मानले जात होते. जेव्हा केपेत काँग्रेसची हवा नव्हती तेव्हापासून त्यांचे वडील काँग्रेसच्या बाजूने होते. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत वेळीप यांनी आपला अर्ज मागे घेत कवळेकर यांना संधी दिली होती. कवळेकर यांना केपे मतदारसंघातून चार वेळा निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची साथ दिली होती. वेळीप हे त्यांचे स्वीय सचिवही राहिले होते. कवळेकर हे भाजपवासी झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद लाभले व वेळीप यांनी त्यांचे स्वीय सचिव म्हणूनही काम पाहिले. मात्र येथेच त्यांच्यात दुरावा येऊ लागल्याची व त्यानंतर कवळेकर यांच्यापासून वेळीप दूर गेल्याची चर्चा सुरू झाली होती.
माघार घेणार नाही वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कवळेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे. त्यामुळे पक्ष आपल्यालाच तिकीट देईल असा दावा त्यांनी केला आहे. चार निवडणुका कवळेकर काँग्रेस पक्षातर्फे लढवून विजयी झाले व त्यांना त्यावेळी आपण सदैव साथ दिली. आताच्या इच्छुकांपैकी एकही उमेदवार कधीच पक्षात नव्हता. एक उमेदवार जे तिकिटावर दावा करत आहेत ते कधी युगोडेपातही जाऊन आलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण येणारी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली असून पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर दुसरा पर्याय तयार ठेवला आहे. तसेच निवडणूक न लढविण्याकरिता कसलीही ऑफर आली, तरी आपण माघार येणार नाही, असेही वेळीप यांनी स्पष्ट केले आहे.