25 दिवसांत तब्बल चार हजार किलो मीटर सायकल प्रवास करणार : केरळचे तरुण बेळगावात दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
छंद आणि देशातील विविध संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी केरळ येथील दोन मित्रांनी केरळ ते जम्मू-काश्मीर असा तब्बल 4 हजार किलो मीटरचा सायकल प्रवास हाती घेतला आहे. 4 जुलै रोजी त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री ते बेळगावात दाखल झाले. फाहिस फरहान व दिलशाद के. ए. अशी या दोन मित्रांची नावे आहेत. यातील फाहिस फरहान हा एका हाताने दिव्यांग असूनदेखील मोठय़ा प्रवासाचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे.
केरळ ते जम्मू-काश्मीर असा चार हजार किलो मीटरचा सायकल प्रवास केवळ 25 दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. दररोज साधारण 150 ते 200 किलो मीटरचा प्रवास सुरू आहे. केरळ येथील मल्लमपूरम येथून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब असा प्रवास करून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार आहेत.
पर्यावरण संवर्धन- आरोग्याचा संदेश
9 राज्यांतून त्यांचा सायकल प्रवास होणार आहे. प्रवासादरम्यान ते पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देखील देत आहेत. आजच्या तरुणांनी फेसबुक, व्हॉट्सऍपमधून बाहेर पडून अधिक प्रमाणात सायकलचा वापर करावा. किमान आठवडय़ातील एक दिवस तरी सायकल चालवून पर्यावरण रक्षणाला हातभार लावावा, असा संदेशदेखील सायकल प्रवासादरम्यान देत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय असून तरुणवर्गासह नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन मित्रांपैकी दिव्यांग असलेला फाहिस फरहान याने सायकलिंगपटू म्हणून उत्तम कामगिरी केली असून त्याची एशिया बुक व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. बेळगावात दाखल झालेल्या या सायकलपटूंना नितीन पाटील व इतर सायकलिंगपटूंचे सहकार्य लाभले.