ऑनलाईन टीम / पुणे :
कोकणासह महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्याच्या घडीला कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे. हाच पाऊस येत्या काही तासांमध्ये चांगला जोर पकडणार आहे. शिवाय रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये आणि त्यासोबतच पुणे- सातारा भागातही मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरुपात सुरु असणारा पाऊस येत्या एक- दोन दिवसांत चांगला जोर पकडणार आहे. 2 व 3 रोजी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये दोन जुलैला अतिवृष्टीची शक्यता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गात जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 1730 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रत्नागिरीत 849 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर मध्ये सर्वात कमी 256 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.