खासदार राऊत यांचे स्पष्टीकरण
वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड झाल्यास योग्यच ठरेल. त्यांना कोकणबाबत प्रेम, जिव्हाळा आहे. सिंधुदुर्गच्या समस्यांकडे त्यांनी यापूर्वीही लक्ष दिले आहे, असे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हय़ात चार आमदार आहेत. गतवेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने यावेळी आमदार उदय सामंत यांना संधी देण्यात आली आहे. कुणीही कोकणातील आमदार मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील पर्णकुटी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात आमदार उदय सामंत यांना संधी दिली. सिंधुदुर्गातून दोन आमदार निवडून आले असतानाही गतवेळी चांगले खाते दिले होते. माजी राज्यमंत्री दीपक केसरकर अभ्यासू आहेत. मात्र, ते नाराज मुळीच नाहीत. आदित्य ठाकरे पालकमंत्री झाल्यास सिंधुदुर्गच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. त्यांना कोकणातील लोकांच्या समस्यांची चांगली जाण आहे.
नारायण राणे संपलेला विषय
सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे हा जनतेच्या दृष्टीने संपलेला विषय आहे. त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांना स्वत:चे असे स्थान काहीच नाही. त्यांनी आपल्यापासून भाजप दूर करावे अन् बोलावे, असेही राऊत म्हणाले. यावेळी वसंत केसरकर, अनारोजीन लोबो, रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, उमेश कोरगावकर, बाबू कुडतरकर, अपर्णा कोठावळे, चंद्रकांत कासार, अशोक दळवी, प्रशांत कोठावळे, ऍड. नीता सावंत, मायकल डिसोजा, रश्मी माळवदे, जि. प. सदस्य नागेंद्र परब उपस्थित होते.