ऑनलाईन टीम / रत्नागिरी :
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या ट्रेनद्वारे कोकणातील आंबा उत्पादकांना हापूसची वाहतूक करता येणार आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता उतरवता येणार आहे. कोकणातील आंबा या ट्रेनद्वारे इतरत्र पोचवता येणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना आता दिलासा मिळणार आहे.
ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. 20 एप्रिलला ही ट्रेन ओखा येथून सुटेल. 21 एप्रिलला सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी रत्नागिरी, 1 वाजून 40 मिनिटांनी कणकवली, 4 वाजून 50 मिनिटांनी मडगाव, तर 9 वाजून 10 मिनिटांनी उड्डपी येथे पोहोचणार आहे. तर 24 एप्रिलला ही ट्रेन तिरुअनंतपुरम येथून निघेल. 1 वाजून 20 मिनिटांनी ती उड्डपी, 6 वाजून 10 मिनिटांनी मडगाव, रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी कणकवली, तर 11 वाजून 10 मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात पोहचणार आहे.