वार्ताहर / शेडगेवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पश्चिम भागातील लोकांची होणारी गैरसोय पाहता कोकरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन वार्ड सुरु करणार, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात दौ ऱ्यावर असताना कोकरूड येथे पत्रकारांशी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, कोकरुडचे ग्रामीण रुग्णालयास प्रशस्त झाले असून याठिकाणी आयसोलेशनवार्ड सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जत येथेही आयसोलेशनवार्ड सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. पश्चिम भागातील रुग्णांना तातडीचे उपचार मिळत नाहीत त्यांना कराड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी नेण्यास उशीर होतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी आयसोलेशनवॉर्ड सुरु करण्यात येणार असून याबाबतीत आरोग्य विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याचे नियोजन आत्तापासूनच सुरु करण्यात आले आहे. धरणातील पाणी हळुहळु सोडण्यात येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरणातून पाणी सोडण्यात येईल.जुलै, ऑगस्टमध्ये आवश्यक साठा सोडून नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी उपाय योजना आखण्यात आली आहे. मणदूर गावातील परिस्थिती हळूहळू निवळेल, निगेटिव्ह टेस्ट आलेल्या लोकांना रोजंदारीसाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांची गैरसोय होत असून जिल्हाबंदी बाबत 30 तारखे नंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले कि, जिल्हाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार यांची गैरसोय होत असून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून लोकांना कायमस्वरूपी पास देण्यात येणार आहेत. कोकरूड येथे चार कॉटचे आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात येणार आहे. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक,युवा नेते विराज नाईक,विश्वासचे संचालक शिवाजीराव घोडे पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, वैधकीय अधिकारी घुले, युवानेते सुहास पाटील , सुरेश चिंचोलकर,आदी मान्यवर उपस्थित होते.