प्रतिनिधी / वारणानगर
वारणानगर परिसरातील आसपासच्या गांवाची मुख्य बाजारपेठ असलेल्या कोडोली ता. पन्हाळा येथील सर्व व्यावसायीक दुकाने सकाळी आठ ते रात्री सात वाजे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोडोली शहर भाजपाच्या वतीने ग्रामपंचायतीला करण्यात आली आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष महेश जाधव यांची निवेदनाद्वारे मागणी सरपंच शकंर पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोडोली कोरोना महाभयंकर रोगावर मात करण्यासाठी व त्याचा संसर्ग रोखण्यासाठी कोडोली ग्रामपंचायतीने दोन महिने गावातील सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेऊन कडकडीत लॉक डाऊन केले होते. त्यामुळे कोडोली गावातील व्यापारयांना व दुकानधारकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. लॉकडाऊन मध्ये शिथलता आणुन कोडोली ग्रामपंचायतीने गावातील दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु गावामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे.
त्यामुळे या लोकांची कामावरून सुटण्याची वेळ पाच आणि गावातील दुकाने बंद होण्याची वेळ ही पाच असल्याने अशा लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत तसेच परिसरातील इतर गावातील नागरीक देखील या बाजार पेठेवर अवलंबून आहेत त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच दुकाधारकांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान याचा विचार करून सकाळी आठ ते रात्री सातवाजे पर्यंत गावातील दुकाने सुरू ठेवण्यात यावीत अशा मागणी निवेदनात केली आहे.
भाजपचे कोडोली शहरअध्यक्ष महेश जाधव यांच्या सोबत युवा मार्चा कोडोली शहर अध्यक्ष राजदिप सावंत, ओंकार बुरांडे माणिक गायकवाड यासह अन्य कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.