ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या उपायाबद्दल तज्ज्ञांकडे अद्याप ठोस माहीती उपल्बध झालेली नाही. तत्पूर्वी कोरोनाच्या समोर येत असलेल्या नव्या प्रकारांमुळे तज्ज्ञांमध्ये ही उपाय योजनांबाबतीत साशंकता आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी याची धास्ती घेतली आहे. यातच भारतातील बारा राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने आपले पाय रोवले आहेत. याच पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना बचावासाठी महत्त्वाचे भाष्य केले असून कोणताही व्हेरिएंट येवो, दो गज दुरी; है मास्क जरुरी असं म्हटले आहे.
डॉ. गुलेरिया यांनी यावेळी माहिती देताना कोरोना व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे की नाही या बद्दल माहिती उपल्बध नाही. या व्हेरिएंटमुळे मुत्यू होतात की नाही हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाची नियमावली काटेकोरपणे पाळल्यास या पासून संसर्गाला अटकाव घालता येतो. आणि आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून वाचू शकतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क वापरणं, स्वच्छता पाळणं, मुख्यत: हात वारंवार धुणं, सुरक्षित अंतर राखणं अशा उपायांचे पालन केल्यास अधिक प्रभावीपणे कोरोनाला अटकाव करता येतो. असे ही ते यावेळी म्हणाले.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली पाळणे आवश्यकच
डेल्टा प्लसचे रुग्ण महाराष्ट्रात अधिक आढळत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे. तसेच जगभरातील तज्ज्ञांनी हा विषाणु अधिक धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांनी ही योग्य नियम पाळण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने ही दिला असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहत कोरोना प्रतिबंध नियमावली पाळणे महत्त्वाचं असल्याचे या निमित्ताने पुन्हा अधोरेखीत झाले आहे.