अध्याय अकरावा
मुक्त पुरुषाची वागणूक कशी असते ते आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलं. त्याच्या शारीरिक क्रियांबद्दल म्हणजे, तो चालतो कसा, पाहतो कसा, बोलतो कसा, खातो कसा, ऐकतो कसा याबद्दल भगवंतांनी सविस्तर सांगितलं. त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ असा की, त्याला सर्वत्र ईश्वरी अस्तित्व जाणवत असल्याने त्याला इतर कोणत्या गोष्टींचे अस्तित्वच जाणवत नाही आणि जाणवेलच कसे. कारण इतर सर्व गोष्टी मिथ्या आहेत हे त्याच्या डोक्मयात पक्के असते. त्यामुळे तो करत असलेली क्रिया आणि ती करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी या सर्वात त्याला ईश्वरच दिसत असतो, जाणवत असतो. विवेकशक्ती जागृत असल्याने काय योग्य, काय अयोग्य ह्याचा निवाडा तो सहजी करू शकतो. तसेच सर्वव्यापी ईश्वराशिवाय इतर सर्व गोष्टी मायिक म्हणजे खोटय़ा आहेत. तेव्हा त्यापासून काय अपेक्षा करायची हा विचार पक्का असल्याने त्याच्या अंगी वैराग्य बाणलेले असते. त्यासाठी त्याला वेगळे प्रयास करावे लागत नाहीत. जेथे विवेक आणि वैराग्य एक होतात, तेथेच नित्याचा म्हणजे ईश्वराचा ध्यास घेतला जातो आणि अनित्याचा त्याग घडत असतो हेच आत्मज्ञान होय. हे आत्मज्ञानरुपी शस्त्र गुरुवाक्मयरूपी सहाणेवर घासून तीक्ष्ण होते आणि ते संकल्पविकल्प यामुळे येणारे संशय समूळ छेदून टाकते. त्याचा परिणाम म्हणून सत्य वस्तु असत्य वाटणे, देहच आत्मा वाटणे या सर्व भावना व वासना निखालस तुटून जातात व आत्मस्वरूपामध्ये पुरुष जागा होतो. अज्ञानामुळे जो आत्तापर्यंत अनेकत्व अनुभवत होता, तो गुरुवाक्मयाच्या कृपा-थापटण्याने अद्वैताचा अनुभव घेतो.
मी आणि माझे हा विषय संपतो. जागेपणी मनुष्याला स्वप्नाची आठवण होते, पण ते खोटे आहे हे वेगळे सांगावे लागत नाही. मुक्ताच्या दृष्टीने जग हे स्वप्नच असते. स्वप्नापासून ज्याप्रमाणे मनुष्य सहजी अलिप्त होतो त्याप्रमाणे मुक्त जगापासून अलिप्त असतो. आता मुक्त पुरुष विहार कसा करतो ? याबद्दल श्रीकृष्ण त्यांच्या जिवीचे गुज उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याचे प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वृत्तीचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, तो देहामध्ये राहात असूनसुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो. पापपुण्याची कथा किंवा सुखदुःखाची वार्ता त्याच्या कानावर जात नाही. एकदा सोडलेल्या संकल्पविकल्पांना कल्पांतीही तो स्पर्श करीत नाही. मी असं करीन, तसं करीन असा पक्का विचार करणे म्हणजे संकल्प करणे. विकल्प म्हणजे इच्छित गोष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करणे आणि हे संकल्पविकल्प मन, बुद्धि, इंदिये आणि प्राण यांचा वापर करून केले जातात पण मुक्ताचे मन, बुद्धी, इंद्रिये आणि प्राण ह्यांना स्वतंत्र अस्तित्व नसल्याने तो स्वतःच्या मनाने कोणताही विचार करत नाही की कोणतीही कृती करत नाही. तो स्वतःला कर्ता समजत नसल्याने त्याला पापपुण्य लागत नाही. मुलांना अलंकाराचे मोल कळत नाही, तरी ते घातल्याने ती शोभू लागतात. त्याप्रमाणे इंद्रिये कर्मात गुंतली असली तरी मुक्त हा अकर्तेपणाने वावरत असतो. संकल्पावांचून विहार करतो तोच खरोखर मुक्त होय. मी जी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्तालाच कळतात. इतरांना विद्वत्तेच्या बळावर मुक्ताला ओळखणे शक्मय नाही. साऱया वेदशास्त्रात निपुण असला, तरी त्यालाही मुक्त ओळखता येणार नाही. ज्याच्या देहामध्ये देहाभिमान आहे त्याला मुक्ताची लक्षणे कळावयाची नाहीत. मी सांगितलेल्या लक्षणांची यादी हातात घेऊन मोठय़ा आतुरतेने एखादा त्रिभुवनात जरी फिरला तरी त्याला मुक्ताची स्थिती कळावयाची नाही. कारण जो खरोखरच मुक्ताला ओळखतो तोही मुक्तच असतो. केवळ अनुमानाने मुक्ताची ओळख होईल ही आशा व्यर्थ आहे. मुक्त हा मुळीच ओळखावयास येत नाही, हे ऐकून उद्धवाला चिंता पडलीही श्रीकृष्णांनी ताडले आणि म्हणाले, आतां लौकिकात मुक्त ओळखता येईल अशीही लक्षणे ऐक.
क्रमशः