मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध, नियम आणि कोरोना विघ्न असतानाही राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उत्सव साजरा करताना कोरोनाच्या सावटाचं भान बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय.”, असं मुख्यमंत्री म्हणाले.