फाळकेवाडी येथील व्यक्तीचा मृत्यू तर सहा जण कोरोनामुक्त
बुधगावात कोरोनाचा शिरकाव
प्रतिनिधी / सांगली
शनिवारी तब्बल १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. हा जिल्हय़ातील आठवा बळी गेला आहे. तर सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या ९७ झाली आहे.
शिराळा तालुक्यात ९ रूग्ण वाढले
जिल्हय़ातील शिराळा तालुक्यात शनिवारी नऊ रूग्ण वाढले. या तालुक्यातील मणदूर येथे कोरोना हा तिसऱया स्टेजमध्ये गेला आहे. त्यामुळे याठिकाणाहून दररोज रूग्ण संख्या वाढत चालली आहे. शनिवारी मणदूर येथे पाच नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ७५ वर्षीय व्यक्ती, ६० वर्षाची महिला, २३ वर्षाची महिला, सात आणि चार वर्षाचा मुलगा, असे पाच रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यातीलच खेड येथील ४४ वर्षीय व्यक्ती, मालेवाडी येथील ६० वर्षीय व्यक्ती पणुंब्रे येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि पुनवत येथील ८५ वर्षाची वृध्दा यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
बुधगाव येथे कोरोनाचा शिरकाव
मिरज तालुक्यातील बुधगाव येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून बुधगाव येथील ५६ वर्षाची आणि ५० वर्षाची महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. या दोघींचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने या महिला ज्या परिसरात राहत होत्य़ा त्या भागात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या दोन्ही महिलांच्या संपर्कातील हाय रिस्क असणाऱया कुटुंबातील व्यक्तींना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहेत. या परिसरात तातडीने औषध फवारणी करण्यात आली आहे.
खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यात रूग्ण वाढले
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६० वर्षाची महिला, भिकवडी येथील ५८ वर्षीय व्यक्ती, पलूस येथील ६७ वर्षीय व्यक्ती यांच्यावरही मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील ५० वर्षीय व्यक्ती याचा कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
फाळकेवाडी येथील व्यक्तीचा मृत्यू
वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील एका व्यक्तीला शुक्रवारी मिरजेच्या कोरोना रूग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल केले होते. त्याचा स्वॅबही घेण्यात आला होता. पण या स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच ही व्यक्ती मयत झाली. पण या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले, त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. या व्यक्तीच्या मृत्यूने आतापर्यंत जिल्हय़ात एकूण आठ जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
सहा जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील आटपाडी तालुक्यातील सोनारसिध्द नगर येथील ५२ वर्षीय व्यक्ती, झरे येथील पाच वर्षाचा मुलगा, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील ३५ वर्षाची व्यक्ती, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील १९ वर्षाचा युवक आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील खरसिंग येथील २१ वर्षाचा युवक यांच्यावर दहा दिवस कोरोनाचे उपचार करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासण्यात आले असता ते निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
चौघांच्यावर अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱ्या रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण २२२
बरे झालेले ११७
उपचारात ९७
मयत ०८