देशात मागील 4 महिन्यांमध्ये 18 हजार टन कोविड बायोमेडिकल वेस्ट तयार : सप्टेंबरमध्ये सर्वात अधिक प्रमाण
भारतात मागील 4 महिन्यांमध्ये 18 हजार टनांपेक्षा अधिक कोविड बायोमेडिकल कचरा निर्माण झाला आहे. सर्वाधिक 3,587 टन कचरा महाराष्ट्रात मिळाला आहे. यासंबंधीची आकडेवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केली आहे. केवळ सप्टेंबरमध्येच देशभरात 5,550 टन कोविड वेस्ट निर्माण झाला आहे.
जैववैद्यकीय कचरा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशभरातून 18,006 टन कचरा एकत्र करून 198 जैववैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पांच्या मदतीने नष्ट करण्यात आला आहे. जैववैद्यकीय कचऱयात पीपीई किट, मास्क, शू कव्हर, ग्लोव्ह्ज, ह्यूमन टिश्यू, रक्ताने संक्रमित सामग्री, ड्रेसिंग, कॉटन स्वाब, ब्लड बॅग, नीडल्स आणि सीरिंज सापडल्या आहेत.
महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सर्वाधिक
महाराष्ट्रात 4 महिन्यांमध्ये 3,587 टन कोविड कचरा तयार झाला आहे. जूनमध्ये 524 टन, जुलैमध्ये 1,180 टन, ऑगस्टमध्ये 1,359 टन आणि सप्टेंबरमध्ये 524 टन कोविड कचरा एकत्र करण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत जूनमध्ये हा आकडा 333 टन, जुलैमध्ये 389 आणि ऑगस्टमध्ये 296 तर सप्टेंबरमध्ये 382 टन राहिला आहे.
कोविड कचरा
कोरोनाबाधिताकडून वापरण्यात आलेली प्रत्येक गोष्ट कोविड कचरा नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिशानिर्देशात स्पष्टपणे नमूद आहे. ग्लोव्ह्ज, मास्क, सीरिंज, फेकलेल्या औषधांनाच कोविड कचरा मानण्यात येत आहे. ड्रेन बॅग, यूरीन बॅग, बॉडी फ्लुइड, ब्लड सोक्ड टिश्यूज किंवा कॉटनलाही यात सामील करण्यात येते. औषधांचे बॉक्स, रॅपर, फळांच्या साली, ज्यूस बॉटलला दैनंदिन कचऱयात ठेवता येते.
दर महिन्याला 9 कोटी मास्कची गरज
जगभरात दर महिन्याला वैद्यकीय कर्मचाऱयांना सुमारे 8 कोटी ग्लोव्ह्ज, 16 लाख मेडिकल गॉगल्ससोबत 9 कोटी मेडिकल मास्कची गरज भासत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अनुमान आहे. हा आकडा केवळ वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून सर्वसामान्य लोक ज्या थ्री लेयर आणि एन95 मास्कचा वापर करत आहेत, त्यांची संख्या अब्जावधीत आहे.
समुद्रातही कोविड कचरा
तीन महिन्यांपूर्वीच सी-डायव्हर्सनी फ्रान्सच्या समुद्र किनाऱयानजीक डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज, मास्क आणि वाइप्स बाहेर काढले आहेत. काही मास्क पाण्यावर तरंगू लागल्याने या कचऱयाची जाणीव झाल्याची माहिती प्रकल्पाचे निरीक्षक डेव हॉफमॅन यांनी दिली आहे.
उघडय़ावर पडलेले मास्क
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून रस्त्यांवर पडलेल्या मास्क, पीपीई आणि वापरलेल्या ग्लोव्हजचे चित्र समोर आले आहे. रस्त्यांवर कोविड कचरा फेकला जात आहे, हा कचरा गाय, माकड बकरी आणि अन्य प्राणी खाऊ शकतात, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास कत्तलखानेच प्राण्यांचा अंतिम टप्पा असणार आहे आणि माणसांनाही विषाणूचा नवा धोका निर्माण होणार असल्याचे पीपल फॉर कॅटल ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक जी. अरुण प्रसन्ना यांनी म्हटले आहे.