राहुल गांधींची सरकारवर टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाचा देशभरात वेगाने प्रसार होत असताना लॉकडाऊन (टाळेबंदी) हटविणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. आताच्या परिस्थितीत कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची गरज होती. चार टप्प्यात लॉकडाऊन करूनही कोणताही त्याचा उपयोग झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.
व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, रूग्ण वाढत असताना आता खऱया अर्थाने 100 टक्के लॉकडाऊनची गरज होती. मात्र सरकार लॉकडाऊन हटवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सल्लागारांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार कमी होईल, असे भाकित केले होते; मात्र मे महिन्यातच सर्वाधिक रूग्ण वाढले. आता सरकारने आपली पुढील उपाययोजना जाहीर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे फसवे आहे. यामुळे गरीबांपर्यंत मदत पोहचणार नाही. सर्वसामान्य आणि उद्योग क्षेत्र आर्थिक मदतीपासून वंचित राहिल्यास गंभीर परिणाम हातील, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्राने राज्य सरकारला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अन्यथा राज्य सरकारांना परिस्थिती हताळणे कठीण होईल, असेही त्यांनी सांगितले. नेपाळ आणि चीनबरोबर सध्या सीमेवरून तणाव सुरू आहे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.