फैलाव आटोक्यात येण्याची चिन्हे कमीच उपचार, लसीकरणामुळे आरोग्य कर्मचाऱयांवर ताण : परीक्षांच्या ताणामुळे विद्यार्थी-पालक धास्तावले
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचा वणवा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून दुसरी लाट अधिक दाहक बनू लागली आहे. त्यातून रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे व शुक्रवारी आतापर्यंतची एका दिवसाची विक्रमी संख्या ठरावी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भरीस लवकरच राज्यात बारावीच्या परीक्षाही प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थी-पालक धास्तावले आहेत.
कोरोनाच्या या कहरात शुक्रवारी 927 रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्याही रोज नव्या गतीने वाढत आहे. शुक्रवारी 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 ते 50 वयोगटातील लोकही कोरोनाचे बळी ठरू लागले आहेत. राज्यातील जवळजवळ सर्वच आरोग्य केंद्रे क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांनी भरली आहेत. लसीकरण केंद्रांवरही लांबच लांब रांगा दिसत असून आरोग्य कर्मचारी अविश्रांत लोकसेवेत व्यस्त आहेत. तरीही कोरोना नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही, असेच सध्याचे चित्र आहे.
शुक्रवारी सापडलेल्या 927 रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्या 6321 वर पोहोचली आहे. 24 तासात सहा जणांचे बळी गेल्यामुळे मृतांची संख्या 868 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 65499 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 58310 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 89.02 टक्क्यांवर पोहोचले असून गत 24 तासात 282 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 100 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहेत तर 357 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
मडगावात 24 तासात 65 रुग्णांची भर
मडगाव आरोग्य केंद्र खचाखच भरले असून गुरुवारी 660 असलेल्या रुग्णसंख्येत शुक्रवारी 65 रुग्णांची भर पडत तेथील संख्या 725 वर पोहोचली. दुसऱया बाजूने पर्वरी केंद्रातही भरमसाठ रुग्ण वाढत असून तेथे 24 तासात 30 रुग्णांची भर पडत संख्या 589 वर पोहोचली आहे. त्याखालोखाल म्हापसा केंद्रात 426, फोंडय़ात 417, कांदोळीत 416, पणजीत 414, वास्कोत 370, कुठ्ठाळीत 345, चिंबल 228, कासावलीत 180, सांखळी 165, शिवोलीत 162, डिचोली 143, हळदोणे 140, पेडणे व चिंचिणीत प्रत्येकी 125, खोर्ली 121, शिरोडा 102, नावेली 100, काणकोण व कुडतरीत प्रत्येकी 97, कुडचडे व कोलवाळमध्ये प्रत्येकी 91, सांगे 89, वाळपईत 88 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 143, सांखळी 165, पेडणे 125, वाळपई 88, म्हापसा 426, पणजी 414, हळदोणा 140, बेतकी 54, कांदोळी 416, कासारवर्णे 30, कोलवाळ 91, खोर्ली 121, चिंबल 228, शिवोली 162, पर्वरी 589, मये 35, कुडचडे 91, काणकोण 97, मडगाव 725, वास्को 370, बाळ्ळी 57, कासावली 180, चिंचिणी 125, कुठ्ठाळी 345, कुडतरी 97, लोटली 106, मडकई 50, केपे 50, सांगे 89, शिरोडा 102, धारबांदोडा 73, फोंडा 417 व नावेलीत 100 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 20 बाधित सापडले आहेत.
- 13 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण 65499
- 16 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 58310
- 16 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण 6321
- 16 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण 927
- 16 एप्रिल रोजीचे बरे झालेले रुग्ण 282
- 16 एप्रिल रोजीचे बळी 06
- आतापर्यंतचे एकूण बळी 868
मुख्यमंत्र्यांचे वारंवार आवाहन
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. मास्क, सेनिटायझर यांचा वापर करावा, सामाजिक दुरी पाळावी, असे आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. तरीही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 400 ते 500 पर्यंत मिळणाऱया रुग्णांच्या संख्येत गुरुवारी अचानक मोठी वाढ होत 757 रुग्ण सापडले होते. शुक्रवारी त्याही संख्येस मागे टाकत तब्बल 927 जणांना बाधा झाल्याचे समोर आले.
कडक निर्बंधांचे भाजपाध्यक्षांचे संकेत
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात कडक निर्बंध जारी करण्यात येतील, असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. अशावेळी तानावडे यांचे कडक निर्बंध जारी करण्याचे संकेत हा लॉकडाऊनचाच प्रकार आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
पर्यटकांना चांचणी सक्तीची करावी : महिला काँग्रेस
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे आता राज्यात येणाऱया पर्यटकांसाठी कोरोना चांचणी सक्तीची करावी, तसेच हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन कोणीही गोव्यात परतत असेल तर त्यांना 15 दिवसांसाठी सक्तीने विलगीकरणात ठेवावे, अशा मागण्या करणारे निवेदन महिला काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आले आहे.
महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या अन्य सदस्यांनी सकाळी 11 वाजता पर्वरी सचिवालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्याची प्रत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही सादर करण्यात आली. या समितीत मुक्तमाला फोंडेकर, रोशन देसाई, प्रिया राठोड, पार्वती नागवेकर, संजना कोलगे, रेखा परब, प्रतिभा बोरकर यांचा समावेश होता.