वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसच्या जलद चाचण्या करण्यास तूर्त केंद्र सरकारने स्थगिती दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. शनिवारी या संदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उचलेली पावले आणि लॉकडाऊन याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने रॅपिड टेस्ट टाळण्यात येत आहेत. शिवाय हे कीट सदोष आणि दर्जाहीन असल्याचेही आढळून आले होते. अनेक राज्यांनी याविषयी तक्रार केल्यानंतर त्याच्या चाचण्या थांबवण्याचे ठरवण्यात आले होते.
या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी आणि वरिष्ठ अधिकाऱयांनी सहभाग घेतला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारच्या उपायांना यश आले आहे. लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून समुह संसर्ग रोखण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरल्याचेही मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. त्याचबरोबर सदोष व दर्जाहीन टेस्ट कीटचा वापर टाळणेही गरजेचे असल्याने सरकारने या कीटद्वारे करण्यात येणाऱया जलद चाचण्या थांबवल्या आहेत. सध्या देशात 15 लाखहून अधिक जलद चाचण्या करण्याची क्षमता आहे. याशिवाय काही भारतीय औषध निर्माण व संशोधन केंद्रांनी जलद चाचणी कीटची निर्मिती केली आहे. त्याचा भविष्यात उपयोग केला जाईल. तसेच या लढय़ामध्ये मदत करण्यासाठी सव्वालाखाहून अधिक स्वयंसेवकांची फौजही प्रशिक्षीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.