दुसऱया लाटेदरम्यान सरकार अपयशी – काँग्रेसकडून श्वेतपत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील कोरोनाच्या संकटावरून मोदी सरकार सातत्याने टीका करत आहेत. याप्रकरणी त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान पंतप्रधानांचे प्राधान्य ऑक्सिजन नव्हे तर बंगाल होते. लोकांचा जीव पंतप्रधानांच्या अश्रूंनी नव्हे तर ऑक्सिजनने वाचविला जाऊ शकला असता. कोविडचे दुःख अवघ्या देशाने भोगले असल्याचे म्हणत राहुल यांनी श्वेतपत्र प्रसिद्ध करत केंद्र सरकारला कोरोना संक्रमणाच्या तिसऱया लाटेचा इशारा दिला आहे. केवळ चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही त्या मांडत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
दुसऱया लाटेवेळी सरकारचा निष्काळजीपणा घातक ठरला. आता तिसऱया लाटेची आतापासूनच तयारी करावी लागेल. कोरोनाविरोधी लढय़ात सर्वात मोठे अस्त्र लसीकरण आहे. सरकारने वेगाने लसीकरण वाढवावे. विषाणू सातत्याने म्युटेड होतोय. तज्ञांनी दुसऱया लाटेचा इशारा दिला होता तरीही सरकारने वेळेत पावले उचलली नव्हती. याचमुळे आम्ही श्वेतपत्रात या चुकांची माहिती देत तिसऱया लाटेशी लढण्यासाठी सूचना केल्या आहेत. जुन्या चुका सुधारूनच तिसऱया लाटेशी लढता येऊ शकते असे राहुल म्हणाले.
4 मुख्य मुद्दे
श्वेतपत्राचा उद्देश मार्ग दाखविणे आहे. आम्ही 4 मुख्य मुद्दे मांडले आहेत.
1 तिसऱया लाटेची तयारी आतापासूनच सुरू केली जावी. मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये.
2 आवश्यक सुविधा तयार केल्या जाव्यात. ऑक्सिजन, बेड औषधांचा तुटवडा भासू नये. प्रत्येक गाव, शहरात ऑक्सिजनसारखी सुविधा पुरेशी असावी.
3 कोरोना केवळ शारीरिक नव्हे तर आर्थिक-सामाजिक आजार आहे. यामुळे गरीब लोक, छोटय़ा उद्योगधंदय़ांना आर्थिक सहाय्य देण्याची गरज आहे. न्याय योजनेचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान याचे नाव बदलू शकतात. यामुळे गरीबांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल.
4 कोविड भरपाई निधी तयार केला जावा. ज्या कुटंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशांना या निधीतून मदत केली जावी.
मृत्यू रोखता आले असते
दोन पद्धतींनी कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतो. होऊ नये असे पहिले आणि वाचविता येणारे यांचा पहिल्या प्रकारात समावेश आहे. तर दुसऱया प्रकारात गंभीर आजार झालेल्यांचा समावेश होतो. भारतात दुसऱया लाटेत 90 टक्के मृत्यू रोखता आले असते. या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण ऑक्सिजनचा तुटवडा हे होते असा दावा राहुल यांनी केला आहे.