जिल्हय़ात सध्या एकही रुग्ण नाही : जिल्हावासीयांनी घाबरु नये, संशय असल्यास सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना विषाणूमुळे होणाऱया आजाराचा सद्यस्थितीत जिल्हय़ात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सतर्क असून खबरदारीच्या उपाययोजना सुरू आहेत. सर्दी, खोकला, श्वास घेण्यातील त्रास न्युमोनिया, अतिसार, मूत्रपिंड निकामी होणे, प्रतिकारशक्तीची कमतरता असणाऱया रुग्णांनी तात्काळ सरकारी दवाखान्यातून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.
चीनमधील हुबेई प्रांतातील कहान शहरात न्युमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून हा आजार कोरोना नावाच्या विषाणुमुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधीत देशातून येणाऱया प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू केले आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेनेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी जवळचा सहवास टाळणे, हाताची नियमित स्वच्छता ठेवणे, न शिजवलेले अथवा अपुरे शिजविलेले मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे आदी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असा सल्ला देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ात या वायरसचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरुन जाऊ नये. संशय असल्यास तात्काळ उपचारासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.