मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
गुरुवारी राज्यात 43 हजार 183 कोरोनाबाधित आढळले, तर249 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत सध्याच्या घडीला राज्यात 3 लाख 66 हजार 533 सक्रीय रुग्ण आहे. यासोबतच राज्यात 1 एप्रिलपासून 45वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. कोरोना लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.