एल. के. अतिक यांनी घेतला परिस्थितीचा आढावा – विद्यार्थ्यांनी नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
धारवाड येथील एसडीएम कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हय़ातही खबरदारी घेण्यात आली आहे. शाळा, कॉलेज व हॉस्टेलमध्ये कोविड-19 मार्गसूचींचे काटेकोर पालन करण्याची सूचना राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव आणि जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी केली आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एल. के. अतिक बेळगावला आले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला. कोरोना परिस्थितीची हाताळणी व लसीकरण या संबंधी त्यांनी अधिकाऱयांकडून माहिती घेतली.
धारवाडसह कर्नाटकातील सहा जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथेही खबरदारी घ्यावी. परराज्यांतून शिक्षणासाठी बेळगावला आलेल्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत का? याची प्रत्येक कॉलेज व्यवस्थापनाने खात्री करून घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
मधुमेह व इतर कारणांमुळे अनेक ठिकाणी ज्ये÷ नागरिक अद्याप लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असे आढळून आले आहे. प्रत्येकांनी लसीचे दोन डोस घ्यावेत. जिल्हय़ात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता नियमानुसार दुसरा डोसही देण्याची सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार म्हणाले, धारवाड येथील कॉलेज विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेळगाव येथेही शिक्षण संस्थांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. अधिकाऱयांनी शिक्षण संस्थांना भेटी देऊन व्यवस्थापन मंडळांशी चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रवास टाळावा
शिक्षणासाठी परराज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील सहा ते आठ आठवडे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी केले. शनिवारी तरुण भारतशी बोलताना ते म्हणाले, परराज्यांतून बेळगावला आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षण संस्थांनी क्वॉरंटाईनमध्ये ठेवावे. त्यांच्या आरोग्यवर लक्ष ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांनीही प्रवास टाळावा. खासकरून अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत आपल्या प्रवास करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.