ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
देशात कोरोनापाठोपाठ आता आफ्रिकी ‘स्वाईन फ्लू’चाही शिरकाव झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला असून, आसाममधील 306 गावांमधील 2500 हून अधिक डुक्करांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेने आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) भारतात आल्याचे स्पष्ट केले आहे. हा रोग आसाममार्गे भारतात आला आहे. या आफ्रिकी स्वाईन फ्लूने आसाम राज्यातील 306 गावातील 2500 हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या डुक्करांना मारण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी आसाम दुसरा पर्यायी मार्ग शोधणार आहे.
आसाममधील आफ्रिकी स्वाईन फ्लू प्रथमच भारतात दाखल झाला असून, त्याचा कोरोनाशी कोणताही संबंध नाही, असेही बोरा यांनी सांगितले.