एक पालक गमावलेली रत्नागिरी जिल्हय़ात 305 बालके
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाच्या जीवघेण्या आजाराने अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. रत्नागिरी जिल्ह्य़ातील एक वा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या आतापर्यंत 392 झाली आहे. त्यापैकी दोन्ही पालक गमावलेल्या 5 बालकांच्या बँक खात्यात राज्य शासनाकडून 5 लाखांचे आर्थिक सहाय्य जमा झाले आहे.
कोरोनामुळे अनेकांनी कुटुंबांतील आधारवड असलेली कर्ती माणसे, निकटवर्तीय गमावले तर अनेक बालकांचे आई-वडीलही हिरावून नेल्याने त्या मुलांचे छत्र हरपलेय. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, आर्थिक तरतूद म्हणून महिला बाल विकास विभागाच्यावतीने बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार नुकतेच राज्यातील 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आले. उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातील बालकांच्या खात्यातही पैसे वर्ग झाल्याचा तपशील जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाला आहे. त्यामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या दापोलीतील 2 तर लांजातील 3 अशा एकूण 5 बालकांचा समावेश आहे. त्या बालकांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य वर्ग करण्यात आले आहे. यामुळे या बालकांना काही प्रमाणामध्ये आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.