आतापर्यंत देशात 26 लाख 47 हजार बाधितांची नोंद : जवळपास 7 लाख सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाबळींचा आकडा वाढत असून आतापर्यंत देशात 50 हजारहून अधिक बळींची नोंद झाली आहे. सोमवारपर्यंत झालेल्या नोंदीनुसार अखेरच्या चोवीस तासात बळींची संख्या 941 ने वाढल्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा 50 हजार 921 इतका झाला आहे. तसेच 57 हजार 981 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 26 लाख 47 हजार 663 इतका झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
देशात कोरोनाचे वेगाने संसर्ग सुरू असून दररोज जवळपास 60 हजारच्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. सदर रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारपर्यंत अखेरच्या चोवीस तासात तब्बल 57 हजार 584 रुग्णांना इस्पितळातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱयांचा आकडा 19 लाख 19 हजार 842 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारल्यामुळे रिकव्हरी रेट सुधारून 72.51 इतका झाला आहे. सध्या देशात केवळ 6 लाख 76 हजार 900 इतके सक्रिय रुग्ण असल्याच आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
देशातील मृत्यूदर 1.92 टक्के
सध्या दिवसभरातील मृतांचा आकडा 900 च्या आसपास आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा 51 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात बळींचे प्रमाण कमी असल्याने मृत्यूदर बराच नियंत्रणात आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार मृत्यूदर 1.92 पर्यंत खाली आल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
राज्यांची स्थिती
देशात कोरोना बाधित आणि बळी या दोन्हीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर आहे. गेल्या दिवसभरात देशात गेलेल्या एकूण 941 बळींमध्ये महाराष्ट्रातील 288 जणांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडू 125, कर्नाटक 116, आंध्रप्रदेश 88, उत्तर प्रदेश 56, पश्चिम बंगाल 51, पंजाब 41, गुजरात 20, झारखंड 16, जम्मू काश्मीर 15, राजस्थान 14, बिहार आणि मध्यप्रदेश प्रत्येकी 11 अशाप्रकारे बळींची नोंद झालेली आहे. आतापर्यंतच्या देशातील एकूण 50,921 बळींमध्ये महाराष्ट्रातील बळींचा आकडा सर्वाधिक असून आतापर्यंत राज्यात 20 हजार 37 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
आतापर्यंत 3 कोटींहून अधिक चाचण्या
देशात आतापर्यंत 3 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती सोमवारी ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली. यापूर्वी 6 जुलै रोजी 1 कोटी तर 2 ऑगस्ट रोजी 2 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. 16 ऑगस्टपर्यंत 3 कोटी 41 हजार 400 (3,00,41,400) नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. सध्या देशपातळीवर एका दिवसात 7 ते 8 लाख इतक्या चाचण्या केल्या जात आहेत. 16 ऑगस्ट रोजी एका दिवसात 7 लाख 31 हजार 697 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. सध्या देशात चाचण्यांचा वेग वाढल्यामुळे बाधितांची संख्याही वाढलेली दिसून येत आहे. नमुने गोळा करून त्यांची तातडीने चाचणी होत असल्यामुळे संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.