दुप्पट होण्याचा कालावधी 10.25 दिवस, बरे झालेले रूग्ण 6 हजार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 26 हजार 917 वर पोहचली आहे. शनिवार ते रविवार या चोवीस तासांमध्ये 1 हजार 975 रूग्णांची वाढ झाली असून ती आजवरची भारतातील एका दिवसातील सर्वाधिक आहे. यापैकी 811 रूग्ण एकटय़ा महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 913 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे उपचारार्थींची संख्या 20 हजार 177 आहे. बरे होण्याचे प्रमाण आता 21.96 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
ही माहिती केंद्रीय आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. उपचार घेणाऱयांच्या संख्येत 111 विदेशी नागरीकांचाही समावेश आहे. शनिवारपासून रविवारपर्यंत एकंदर 47 लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 22 मृत्यू केवळ महाराष्ट्रातील आहेत. मुंबई आणि पुणे परिसरात या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. राजस्थानात 8, मध्यप्रदेशात 7, गुजरातमध्ये 6 आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू येथे प्रत्येक 1 व्यक्ती प्राणास मुकला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत
एकंदर मृत्यूंचे प्रमाणही महाराष्ट्रात जास्त असून त्या राज्यात 323, गुजरातमध्ये 133, मध्यप्रदेशात 99, दिल्लीत 54, आंध्र प्रदेशात 31 आण राजस्थानात 33, उत्तर प्रदेशात 27, तेलंगणात 26, तामिळनाडूत 23 तर कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 17, जम्मू-काश्मीरात 6, केरळमध्ये 4 तर झारखंड आणि हरियासात प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली.
उत्तराखंड कोरोनामुक्तीच्या मार्गावर
उत्तराखंडात एकंदर 50 बाधित आढळले असले तरी त्यापैकी 36 बरे झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. उरलेल्यांपैकी बहुतेकांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे राज्य गोवा, मणीपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश आणि मेघालयप्रमाणे कोरोनामुक्ती घोषित करू शकेल असे अनुमान काही तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.