रूग्णसंख्या 50 हजारांच्या घरात, 1 हजार 694 जणांनी प्राण गमावले
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 हजारांच्या घरात पोहचला असून सध्या तो 49 हजार 319 इतका आहे. तसेच मृतांच्या संख्येतही वाढ झाली असून ती 1 हजार 694 पर्यंत पोहोचली आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये बाधितांच्या संख्येत 2 हजार 958 ची वाढ झाली असून मृतांची संख्या 111 ने वाढली आहे. तसेच याच कालावधीत आतापर्यंत एकंदर 13 हजार 160 जण पूर्ण बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी संध्याकाळी देण्यात आली आहे.
मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या कालावधीत गुजरातमध्ये 49, महाराष्ट्रात 34, राजस्थानात 12, पश्चिम बंगालमध्ये 7, उत्तर प्रदेशात 3, पंजाब आणि तामिळनाडून प्रत्येकी 2 तर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी 1 रूग्ण मृत्युमुखी पडला आहे. एकंदर, 1 हजार 694 मृत्यूंमध्ये महाराष्ट्र 617 मृत्यूंसह आघाडीवर आहे. तर गुजरातमध्ये 368 मृत्यू आहेत. मध्यप्रदेश 176, पश्चिम बंगाल 140, राजस्थान 89, दिल्ली 64, उत्तर प्रदेश 56, आंध्र प्रदेश 36, तामिळनाडू 33, तेलंगणा 29, कर्नाटक 29, पंजाब 25, जम्मू-काश्मीर 8, हरियाणा 6, केरळ व बिहार प्रत्येकी 4, झारखंड 3 तर मेघालय, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, ओडीशा, आसाम उत्तराखंड या राज्यांमध्ये प्रत्येकी 1 अशी मृतांची आकडेवारी आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
बाधितही महाराष्ट्रात सर्वाधिक
बाधितांची संख्या महाराष्ट्रात 15 हजार 525 इतकी आहे. तर त्याखालोखाल ती गुजरातमध्ये 6 हजार 245 इतकी आहे. दिल्लीत 5 हजार 104, तामिळनाडू 4 हजार 58, राजस्थान 3 हजार 158, मध्यप्रदेश 3 हजार 49 आणि उत्तर प्रदेश 2 हजार 880 अशी रूग्णांची संख्या आहे.