प्रतिनिधी/ चिपळूण
एकीकडे कोरोनाबाधित वृध्देवर अंत्यसंस्कार करण्यास नारदखेरकी येथील काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. तरीही प्रशासकीय यंत्रणेने हे सोपस्कार पार पाडले. असे असतानाच दुसरीकडे अज्ञाताने थेट जिल्हाधिकाऱयांना दूरध्वनी करून हा मृतदेह जळालाच नसल्याचे कळवल्याने शनिवारी प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. अधिकाऱयांनी गावात जाऊन पाहणी केल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळाल्याचे दिसून आले. त्यामुळे तसा अहवाल जिल्हाधिकाऱयांना पाठवण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पनवेल येथून आलेल्या व त्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय वृध्देचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिच्या रूपाने हा कोरोनाचा जिल्हय़ातील चौथा बळी ठरला. तालुक्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू हा पहिलाच प्रकार असल्याने अंत्यसंस्कार कसे पार पाडावेत, कोणती काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न व त्याची भीती प्रशासनापुढे होती. अशातच तिच्यावर नारदखेरकी गावात अंत्यसंस्कार करण्याचे ठरवण्यात आले. मात्र याला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. त्याला बरीच कारणे होती. मात्र अशा प्रसंगात ही कारणे बाजूला ठेवून तिच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करूया, अशी समज पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे विरोध करणाऱया ग्रामस्थांची काढत होते. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर प्रशासनाने ताठर भूमिका घेत हा विधी गावातच पार पाडला.
याची सर्व तयारी ग्रामपंचायतीने केली होती. त्यानुसार मृतदेह गावात आल्यावर पीपीईकीट परिधान केलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांसह तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सरीता पवार, पोलीस निरीक्षक पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव उपस्थित होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर अधिकारी, कर्मचारी कार्यालयांमध्ये आले. असे असतानाच गावातील अज्ञाताने जिल्हाधिकाऱयांना दूरध्वनी करून या वृध्देचा मृतदेह अर्धवट जळाल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी ही माहिती येथील अधिकाऱयांना देण्यात आली आणि खळबळ उडाली. त्यामुळे सर्व यंत्रणेसह तहसीलदार सूर्यवंशी ही पुन्हा स्मशानभूमीत गेले. मात्र तेथे पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे जळून गेल्याचे दिसले. त्यामुळे तसा अहवाल देण्यात आला आहे. मात्र हा दूरध्वनी नेमका कोणी केला, याचा उलगडा झाला नसून कॉलर आयडीच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध लागल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.