प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक राज्य सरकारने कोरोना संसर्गामध्ये मुत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाखाची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात मयताच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. याचा लाभ आता खानापूर तालुक्यात कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना मिळू लागला आहे. खानापूर तालुक्यातील दहा वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या धनादेशचे वितरण आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार रेष्मा तालिकोटी व इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी तहसीलदार रेष्मा तालिकोटी यांनी प्रास्ताविक भाषणात सदर योजनेची माहिती दिली. व या योजनेंतर्गत तालुक्यातील दहा वारसांना प्रत्येकी 1 लाखाची मदत मंजूर झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, कोरोना संसर्गामुळे अनेकांना स्वर्गवास पत्करावा लागला. यामुळे त्यांच्या वारसदारांवर मोठी आपत्ती ओढविली. कोरोना संसर्गात मुत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.
त्यासंदर्भात विधानसभेतही चर्चा झाली होती. राज्य शासनाने याची दखल घेऊन कोरोना संसर्गात मुत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 1 लाखाचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱयांनी सदर योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवून त्याचा लाभ या योजनेला पात्र ठरणाऱया लाभार्थीपर्यंत पोहोचवावा, अशी विनंती केली.
यावेळी वारसदार मिनाक्षी शिवाजी पाटील करंबळ, गीता सुरेशसिंग रजपूत नंदगड, रोशन राजू गावडे कणकुंबी, परशराम नारायण पाटील सन्नहोसूर, छाया जोतिबा बेळगावकर खानापूर, लक्ष्मी केदारी कोडोळी अवरोळी, राजश्री लक्ष्मण लोहार नंदगड, संतोष जयवंत परब शिंपेवाडी, शाहिनाबानू महबूबसाब मुल्ला नंदगड, शरपुनबी इस्का शिंगरगाव नंदगड आदींना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.