धसका घेवून वडिलांचाही हृदयविकाराने मृत्यू, विजयनगर येथील घटनेने हळहळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोरोनामुळे माणसांच्या मनात माया, प्रेम, सहानभूती, आपुलकी असून देखील ते दाखविण्याचे धाडस लुप्त झाले आहे. वडील किंवा आईच्याच निधनानंतर मुलांना त्यांच्या अंत्यविधीला देखील जाणे अवघड झाले आहे. या कोरोनामुळे काही कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींचे निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विजयनगरमध्येही अशीच एक घटना घडली असून मुलाला कोरोना झाल्याचे समजल्याने वडिलांना धक्का बसला. त्यानंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाले तर कोरोनाने मंगळवारी आईचे आणि त्या मुलाचेही निधन झाले. ही धक्कादायक घटना घडल्यामुळे त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक हे मोठय़ा शोकसागरात बुडाले आहेत.
विजयनगर येथील प्रशांत चन्नबसु मंदागणी (वय 44) या सामाजिक कार्य करणाऱया युवकाचा तर त्याची आई सुशिला (वय 62) हिचा देखील गुरुवार दि. 24 रोजी कोरोनाने बळी घेतला. या घटनेमुळे विजयनगरसह शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. कोरोनाने या सर्वांचा बळी घेतला. प्रशांत याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याचे वडील चन्नबसु यांनी धसका घेतला. त्यामुळे त्यांना सोमवार दि. 14 रोजी हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सहानभूती बरोबरच आधार देण्याचे काम जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी करत असतात. मात्र कोरोनामुळे ती सहानभूती आणि भावना व्यक्त करता येत नाही. केवळ हळहळ व्यक्त करुन प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. प्रशांत हा एक अत्यंत मनमिळावू आणि प्रत्येकाला मदत करणारी व्यक्ती होती.
विजयनगर येथे घर असले तरी समादेवी गल्ली येथे काही व्यावसायिकांशी त्यांची मैत्री होती. त्या मैत्रीमुळे तो नेहमीच समादेवी गल्लीमध्ये येत होता. कुणालाही अडचण आली तर तो मदत करण्यास पुढे येत होता. कोरोना काळात देखील प्रशांतने मास्कचे वितरण केले. अनेकांना सॅनिटायझर वाटले. प्रत्येकाला काळजी घ्या, असे तो सांगत होता. आर्सेनिक अल्बम-30 या गोळय़ांचे वितरण देखील त्याने केले होते. प्रत्येकाला कोरोनापासून सावध रहा, अशी सूचना करत असताना प्रशांत यालाच कोरोना झाला आणि या कोरोनाने त्याला सर्वांपासून दूर केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचे निधन झाले. प्रशांत याने आयआयटीमध्ये सॉप्टवेअर इंजिनिअर ही पदवी घेतली होती. तो परदेशामध्ये होता. त्याला एक भाऊ असून तो भाऊ लष्करामध्ये सेवा बजावत आहे. त्यामुळे आई-वडिलांची सेवा करणारा कुणीच घरी नाही. त्यामुळे परदेशातील नोकरी सोडून तो विजयनगर येथे आला. आपल्या आई-वडिलांची देखभाल करत असताना समाजातील इतर गरजूंनाही त्यांनी मदतीचा हात दिला आहे. मात्र कोरोनाने या कुटुंबावरच काळाने झडप घातली. या घटनेमुळे त्याच्या भावाला मोठा धक्का बसला आहे. अनेक त्याचे मित्र देखील हळहळ क्यक्त करत आहेत.