प्रचारसभांचा वेळही कमी केला ः राहुल गांधींकडून यापूर्वी सर्व सभा रद्द
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा प्रभाव बंगालच्या उर्वरित टप्प्यांमधील निवडणूक प्रचारावरही दिसू लागला आहे. तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आता कोलकात्यात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 26 एप्रिल रोजी एका प्रतिकात्मक बैठकीत सामील होतील. त्यांनी सर्व जिल्हय़ांमधील प्रचारसभांचा स्वतःचा वेळ 30 मिनिटांपुरती मर्यादित केला आहे. यासंबंधीची माहिती तृणमूल नेते डेरेक ओ ब्रायन यांनी दिली आहे.
तर पक्ष कुठलीच मोठी सभा घेणार नसल्याचे विधान वरिष्ट नेते आणि भवानीपूर मतदारसंघातील उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी केले आहे. तर डाव्या पक्षांकडूनही राज्यात मोठी प्रचारसभा आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांना कुठलीही सभा अर्ध्या तासाहून अधिक वेळेची नसावी असा निर्देश दिला आहे. ममतांची आता केवळ 26 एप्रिल रोजी एक प्रचारसभा होणार आहे. बंगालमध्ये सध्या 22, 26 आणि 29 एप्रिल रोजी तीन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहेत. सहाव्या टप्प्यात 43, सातव्या टप्प्यात 36 आणि आठव्या टप्प्यात 36 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याचमुळे बंगाल सरकार लोकांची सुरक्षा पाहता सर्व आवश्यक पावले उचलत आहे. अतिरिक्त औषधे आणि लसींच्या डोसची मदत करण्यासाठी पंतप्रधानांशी संपर्क करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोरोनाची स्थिती पाहता पश्चिम बंगालमधील स्वतःच्या सर्व जाहीरसभा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला होता. अशा काळात या जाहीरसभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करावा असे राहुल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले हेते.