जिल्हय़ात 1806 विद्यार्थ्यांनी घेतला खासगी शाळांतून सरकारी शाळांमध्ये प्रवेश
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी शाळांच्या सबलीकरणासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीदेखील पालकांची मानसिकता आणि इंग्रजी शाळांचे महत्त्व यामुळे सरकारी शाळांची पटसंख्या घटली असल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र, कोविड-19 चा कार्यकाळ सरकारी शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून 2020-21 या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांमधून सरकारी शाळेत दाखल होणाऱया विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हय़ात इ. 1 ली ते 10 वी इयत्तेत 1806 विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतून थेट सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. सरकारी शाळांच्या प्रगतीसाठी ही बाब सकारात्मक ठरली आहे.
गत 10 वर्षांपासून सरकारी शाळांची संख्या सातत्याने घटत असून कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर विलीनीकरणाची टांगती तलवार आहे. शिवाय पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना भ्रमंती करण्याची वेळ आली होती. तरीदेखील विद्यार्थी सरकारी शाळांकडे आकर्षित होत नसल्याचे दिसून आले होते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांनी सरकारी शाळांची वाट धरली असून यामुळे मागील 14 वर्षात यंदा प्रथमच सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या राज्यात 90 हजाराने वाढली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या वाढली आहे.
सौंदत्ती तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी
सरकारी शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध असतानादेखील खासगी शाळांची भुरळ आणि इंग्रजीकडे वाढता कल यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील खासगी व्यवस्थापनांच्या शाळांकडे वळले होते. मात्र कोरोनाकाळात हे चित्र पालटले असून सौंदत्ती तालुक्यातून सर्वाधिक 441 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. कित्तूर शैक्षणिक तालुक्यातदेखील 407 विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत. बेळगाव ग्रामीणमधून 214 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
बैलहोंगल तालुक्यातील खासगी व्यवस्थापनातील 337 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. बेळगाव शहरातील संख्या विचारात घेता 70 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांची वाट धरली आहे. खानापूरमधील विद्यार्थीसंख्या देखील समाधानकारक असून 254 विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळले आहेत. रामदुर्ग तालुक्यातील 83 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 1806 विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळेत आले आहेत.
सरकारी शाळांसाठी अच्छे दिन
सरकारी शाळांची पटसंख्या घटल्याने शाळा टिकणे कठीण बनले होते. मात्र, कोरोना काळानंतर सरकारी शाळांसाठी अच्छे दिन येणार आहेत. खासगी शाळांकडून करण्यात येणारी फी वसुली, ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांना बसणारा भुर्दंड, समस्या कोणतीही असली तरी शाळेच्या नियमानुसार करावी लागणारी अंमलबजावणी यामुळे अनेक पालकांनी खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांचे नाव कमी केले आहे. यामुळे सरकारी शाळांना अच्छे दिन आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारी शाळांमध्ये इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले असून सरकारी शाळांमधील सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.
इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या
सरकारी शाळांमध्ये इयत्तानिहाय दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इ. 5 वीची विद्यार्थीसंख्या अधिक आहे. 264 विद्यार्थी सरकारी शाळेत दाखल झाले आहेत. इ. 1 ली मध्ये 120 विद्यार्थी दाखल झाले आहेत. इ. दुसरीमध्ये 196, इ. 3 रीमध्ये 173, इ. 4 थीमध्ये 179, इ. 6 वीमध्ये 216, इ. 7 वीमध्ये 130 विद्यार्थी, इ. 8 वीमध्ये 288 तर इ. 9 वीमध्ये 147 विद्यार्थी दाखल झाले आहेत. इ. 10 वीमध्येदेखील 93 विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.