भारत बायोटेक हैदराबाद-आयसीएआरची जोरदार तयारी : बेळगाव-गोव्यासह 12 ठिकाणी होतेय चाचणी
दीपक प्रभावळकर/ सातारा
जगात पाच लाखाहून अधिकांचा जीव घेणाऱया कोरोनावर संपूर्ण भारतीय बनावटीची जगातली पहिली लस-व्हॅक्सीन तयार झाली असून भारतीय स्वातंत्र्यदिनी ती रुग्णसेवेत दाखल होणार असल्याचे संकेत पुण्याच्या ‘एनआयव्ही’मधून मिळत आहेत. गेल्या कित्येक शतकातील सर्वात भयानक महामारीवर अद्याप जगभरात कोणतीही लस उपलब्ध नाही. हैदराबादच्या भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सीन’ ब्रँडनेमने बनवलेल्या लसीची देशभरात बारा ठिकाणी मानवी चाचणी सुरू असून त्यात बेळगावसह गोव्याचा समावेश आहे.
कोरोनाने साऱया जगाला व्यापून टाकले आहे. जगभरात सुमारे 2 कोटी तर देशात 6 लाख लोकांना लागण झाली असून जगात 5 लाख 20 हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम जगभरातल्या 300 संस्था काम करत असल्या तरी केवळ 15 चाचण्या मानवीय चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत. भारत बायोटेक, आयसीएमआर व पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच एनआयव्हीने ‘कोव्होक्सीन’वर संयुक्त काम केले आहे. क्लिनिकल चाचण्या पूर्ण करून आता मानवी चाचणीपर्यंत त्याचा प्रवास सुरू आहे. देशातील बेळगाव, गोव्यासह विशाखापट्टणम, रोहतक, नवी दिल्ली पाटणा, नागपूर, गोरखपूर, कट्टनकुलर, हैदराबाद, कानपूर व आर्यानागपूर या 12 ठिकाणी हे काम सर्वाधिक प्राधान्याने करण्याचे आदेश केंद्राच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
सध्याच्या वेगाने या चाचण्या पूर्ण करून 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सार्वजनिकरित्या वापरली जाणार आहे. जगात या महामारीवर कोणतीही लस उपलब्ध नसताना कोविड-19 वर बीबीव्ही152 कोविड व्हॅक्सीन ही लस कोव्हॅक्सीन पूर्ण होत असताना आजवर लस बनवण्याच्या भारताच्या सर्वात्तम कामगिरीवर पुन्हा एकदा मोहर उठणार आहे.
मोदींनी वितरणाचा बनवला प्लॅन
स्वातंत्र्यदिनी रुग्णसेवेत दाखल होत असलेली ही लस देशाच्या कानाकोपऱयांत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यकर्मी, कोरोना योद्धा, प्रशासन यांना प्राध्यान्य देण्याबरोबरच देशात सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे.
टॉसिलीझुमॅबचा होतोय तुटवडा
कोरोनावर सर्वात जास्त परिणामकारक इंजेक्टेबल ठरलेल्या टॉसिलीझुमॅबचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेही लस येण्याकडेच साऱया जगाचे लक्ष लागलेले आहे.
रिकॉम्बॅक्ट बीसीजीचे परिणाम सप्टेंबरपर्यंत येणार
इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत काही संस्था व्हॅक्सीनवर मोठय़ा वेगाने काम करत आहेत. पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्डसह अमेरिकेतल्या रिकॉम्बॅक्ट बीसीजी या लसींवर काम करत असून देशातल्या 80 संस्थांसोबत त्यांनी मानवी चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 9 संस्थांमध्ये या चाचण्या झाल्या असून त्यात कराडच्या कृष्णासह कोल्हापूच्या सीपीआरचाही समावेश आहे.
भारतात बीसीजीची लस देण्यात येते. त्यामुळेच भारतात मॉरटॅलिटी रेट खूप कमी असल्याचे मानले जाते. त्याच संदर्भाने रिकॉम्बॅक्ट बीसीजी ही लस शोधण्याचे काम सुरू झाले होते. याच्याही मानवी चाचण्यांचे योग्य परिणाम सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्मयता आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.