कोरोना महामारीचा फैलाव लॉकडाऊनच्या काळात जेवढा शिखरावर होता त्याप्रमाणेच आता नवीन रुग्णांची भर पडताना दिसत आहे. म्हणून केरळमधून बेंगळूरला आलेल्यांची स्वॅब तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
कर्नाटकात सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग 22 फेब्रुवारीपासून नियमित भरविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पहिली ते पाचवीपर्यंतचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. शाळा नियमितपणे सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना हजेरीची सक्ती नाही. एकीकडे कमी झालेला कोरोना महामारीचा फैलाव पुन्हा वाढतो आहे. त्यामुळे कर्नाटकाची राजधानी बेंगळूर व केरळच्या सीमेवर केवळ आठवीचे नियमित वर्ग भरविण्याचे शिक्षण खात्याने ठरविले आहे. मंगळवारी कोविड-19 सल्लागार समिती, आरोग्य व शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांच्या बैठकीनंतर प्राथमिक व प्रौढ शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
कोरोना महामारीचा वाढता फैलाव लक्षात घेऊन केरळहून कर्नाटकात येणाऱयांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीने राज्य सरकारला दिला आहे. कारण केरळमधून बेंगळूरला आलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ज्या परिसरात केरळचे विद्यार्थी अधिक प्रमाणात राहतात, त्या परिसरावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना महामारीचा फैलाव कमी होताच मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा जणू विसरच पडला आहे. सरकारी यंत्रणा वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन करीत असली तरी ‘आपल्याला काय होणार?’ या थाटात सर्वसामान्य नागरिक वावरताना दिसत आहेत. बेंगळूरमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता दुर्लक्षपणाचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना फटका बसणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. बेंगळूरमधील एका अपार्टमेंटमध्ये पार्टी साजरी केली होती. या पार्टीत भाग घेतलेल्या 100 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना महामारीचा फैलाव लॉकडाऊनच्या काळात जेवढा शिखरावर होता त्याप्रमाणेच आता नवीन रुग्णांची भर पडताना दिसत आहे. म्हणून केरळमधून बेंगळूरला आलेल्यांची स्वॅब तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला कर्नाटकात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तोच दुसऱया टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शाळा-कॉलेज पूर्ववत सुरू झाल्या आहेत. जत्रा, यात्रा, लग्न समारंभांना गर्दी होऊ लागली आहे. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येत असतानाच राजधानीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या केवळ कोरोना योद्धय़ांना लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतर किमान चाळीस दिवस मद्यपान करू नये, या अटीमुळे अनेक जण लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी घेणे हाच मोठा पर्याय आहे. अलीकडे जत्रा, यात्रा, लग्न समारंभातील गर्दी लक्षात घेता कोणालाच याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. कोरोना महामारीचा नायनाट होईपर्यंत तरी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी 14 जानेवारीपासून सुरू झालेल्या पंचमसाली समाजाची पदयात्रा बेंगळूरला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडी तीव्र झाल्या आहेत. पक्षाला अडचणीत आणणाऱया आरक्षणाच्या आंदोलनात सरकारच्या प्रतिनिधींनी का भाग घ्यावा असा मुद्दा भाजपच्या नेत्यांनीच उपस्थित केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल व केंदीय मंत्री सदानंदगौडा यांनी आंदोलनात भाग घेतलेल्या मंत्री-आमदारांचा खरपूस समाचार घेतला आहे. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर स्वतः के. एस. ईश्वरप्पा यांच्यासह भाजपचे अनेक नेते होते. पंचमसाली आंदोलनाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ हे करत आहेत. पंचमसाली गुरुपीठाचे जगद्गुरु जयमृत्युंजय स्वामीजी व त्याच समाजाचे हरिहर पीठाचे जगद्गुरु वचनानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला वीरशैव लिंगायत मठाधीशांनीही पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शवितानाच वीरशैव लिंगायत समाजातील इतर पोटजातींनाही आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. पंचमसालींना आरक्षण देऊ नये, अशी ओरडही सुरू झाली आहे. विणकर समाजाने त्याला आक्षेप घेतला आहे.
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा व त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पक्षाच्या शिस्तभंग समितीने बसनगौडा यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. या नोटिसीला 15 दिवसात उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. एकीकडे आणखी दोन-अडीच वर्षांसाठी येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असतील असे हायकमांडकडून स्पष्ट केले जात असतानाच मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय भ्रष्टाचारात बुडाले आहेत, असा आरोप करीत नेतृत्वबदलाची मागणी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बसनगौडा यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या आरोपांमुळे कर्नाटकात भाजपची नाचक्की झाली आहे. पक्षाने कर्नाटकातील घडामोडींची गांभीर्याने दखल घेतली आहे. पंचमसाली समाजाचा मेळावा 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याच्या आत पक्षाने बसनगौडा यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी व समाजाचा समावेश 2ए प्रवर्गात केल्याचे घोषित करावे. तरच आपले आंदोलन मागे घेतले जाईल नपेक्षा विधानसभेसमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा पंचमसाली जगद्गुरुंनी दिला आहे. आता वक्कलिग समाजानेही आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. बेळगावात तर लिंगायत समाजाने आपल्याबरोबरच मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सरकारच्या अडचणी वाढत असतानाच त्याला पर्यायी आंदोलने उभी करून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सिद्धरामय्या यांनी पुन्हा अहिंद (अल्पसंख्याक, मागास, अनुसूचित जाती-जमाती) जप सुरू केला आहे. या वर्गाला एकत्र करून काँग्रेसची ताकद वाढविण्याची त्यांची खेळी आहे. पुढील आठवडय़ात आरक्षणाच्या मुद्दय़ावरील ठळक घडामोडींना कर्नाटक साक्षीदार ठरणार आहे.