वार्ताहर / सावंतवाडी:
गेल्या वर्षभरापासून कारोना महामारीचे संकट ओढवले आहे. या काळात जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, आरोग्य सेविका, मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात कंत्राटी सेवेसाठी डॉक्टर, परिचारिका कोरोना केअर सेंटरमध्ये काम करण्यास पुढे आले आहेत. त्यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मेगा भरतीत प्रथम स्थान दिले जाईल, अशी ग्वाही जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी स्पष्ट केले.
केंद्र, राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या योजनांचे फलक ग्रामपंचायत, शाळा, एसटी स्थानके येथे लावण्यात येणार आहेत. जेणेकरून लोकांना जि. प. च्या योजना कळतील, असे त्या म्हणाल्या. जि. प. अध्यक्षा मंगळवारी सावंतवाडीत आल्या होत्या. त्यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी सावंतवाडी सभापती निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ, जि. प. माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, रवींद्र मडगावकर, गटविकास अधिकारी विनायक नाईक, श्रीपाद पाताडे आदी उपस्थित होते.
जि. प. अध्यक्षा म्हणाल्या, जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी आणि येत्या मे महिन्यापर्यंत हा जिल्हा कारोना मुक्त करण्यासाठी तिन्ही आमदार, खासदार जिल्हाधिकारी आणि आम्ही सर्व एकत्र प्रयत्न करीत आहोत. कोरोना आपत्तीत कुणी राजकारण करू नये, असे आपले मत आहे. सध्या रुग्णांना बेडस्, ऑक्सिजन उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱयांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीही चांगले कार्य करीत आहेत. आमदार नीतेश राणे हे चांगलं कार्य करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लस देण्यासाठी केंदे सुरू करावीत, अशी मागणी आपण केली आहे, असेही त्या म्हणाल्या. शासनामार्फत अंध, अपंगांना घरपट्टी 50 टक्के माफ करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी, ग्रामसेवकांनी याबाबत अपंगांची यादी करून त्यांची घरपट्टी 50 टक्के माफ करावी. तसेच माजी सैनिकांची घरपट्टी माफ करावी, असे अधिकाऱयांशी बोलताना स्पष्ट केले.
सौ. सावंत म्हणाल्या, सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर देण्यात आले होते. पैकी चार फक्त वापरात आहेत. सहा पडून आहेत. याबाबत आपण लक्ष देणार आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी याकडे लक्ष द्यावे. आमदार नीतेश राणे ज्या पद्धतीने कणकवली मतदारसंघात कोरोना काळात काम करीत आहेत, त्या पद्धतीने केसरकर यांनी काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी जिल्हा प्रशासनावर अनास्थेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, अध्यक्षा म्हणाल्या, त्यांचे ते वैयक्कि मत आहे. प्रशासन चांगले काम करीत आहे.