पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते आवाहन : ग्रामीण भागातील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.पहिल्याच दिवशी 8,189 घेतली लस
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल रविवारी 16 ठिकाणी आयोजित केलेल्या ‘टिका उत्सवा’स प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व आरोग्य केंद्रे, सरकारी आणि खासगी इस्पितळे आणि पंचायत कार्यालये येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाचा सुमारे 8 हजार 189 नागरिकांनी लाभ घेतला. शनिवार व रविवार असे दोन दिवस मिळून एकूण 15 हजार जणांनी कोरोनाची लस घेतली. गोमंतकीयांनी या मोहिमेस दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून राज्य सरकारने रविवार 11 पासून ‘टिका उत्सव’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पन्नास ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था
साळगाव, पेन्ह द फ्रान्स, सुकूर, थिवी, वाळपई, हळदोणे, पर्ये, मांदे, मये, शिवोली, सांताक्रूझ, पेडणे, सांखळी, मेणकुरे, साळ, काणकोण अशा एकूण 50 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी रविवारी दुपारी तिसवाडी तालुक्यात मेरशी येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस, अनिल होबळे उपस्थित होते.
सर्वांना विश्वासात घेऊन ‘टिका उत्सव’चे आयोजन
यावेळी पत्रकारांशी बोलताना शेट-तानावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांना आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन टिका उत्सवाचे आयोजन केले. लस घेण्यास पात्र असलेल्या आणि वयाची पंचेचाळीशी पार केलेल्या प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तानावडे यांनी केले.
आतापर्यंत 1 लाख 35 हजारजणांनी घेतली लस
पुढे बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत राज्यातील अंदाजे 1 लाख 35 हजारपेक्षा अधिक लोकांनी पहिली लस घेतली आहे. सुमारे 30 हजारपेक्षा जास्त लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्यातील जिल्हा इस्पितळ, उपजिल्हा इस्पितळ आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील लसीकरणाची संख्या चांगली असली तरी अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचावी यासाठी केंद्राच्या सहकार्याने राज्य सरकारने आता लोकांपर्यंत लस नेण्याचे नियोजन केले आहे.
रविवारी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
काल रविवारी पाहिल्याच दिवशी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांपैकी बहुतांश ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मेरशी येथे दुपारपर्यंत सुमारे 250 लोकांनी लस टोचून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पर्वरी येथे संजय स्कूलमध्ये आयोजित लसीकरणाचा दुपारपर्यंत सुमारे 150 लोकांनी लस टोचून घेतली. तसेच 300 लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती, अशी माहितीही शेट-तानावडे यांनी यावेळी दिली.
विरोधी आमदारांचेही मिळतेय सहकाय
टिका उत्सव मोहिमेमध्ये पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी, नेते आणि तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत असून आम्ही सर्वजण तळमळीने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राबत आहोत. विरोधी आमदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून लसीकरणास पात्र असलेल्या गोमंतकीयांनी स्वतःच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सदानंद शेट-तानावडे यांनी शेवटी केले.
उत्सव मानून लसीकरण करुन घ्यावे : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी मनामध्ये कोणताही किंतू न बाळगता लसीकरण करून घ्यावे. यासाठी लसीकरण हा उत्सव समजून लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले होते. आपण उत्सवप्रिय भारतीय गावापासून दिल्लीपर्यंत होणाऱया अनेक धार्मिक सण, उत्सव आदी कार्यंक्रमांत मोठय़ा संख्येने आणि उत्साहाने सहभागी होतो. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण हा उत्सव मानून यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. या आवाहनास अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने पावले उचलून राज्यात टिका उत्सवाचे आयोजन केल्याचे शेट-तानावडे म्हणाले.
दहाजणांचा गट करुन लसीकरणास यावे : आरोग्य खाते
लसीच्या एका लहान बाटलीत 10 डोसचा समावेश असून लोकांनी 10 जणांचा गट करुन लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे लसी वाया जाणार नाहीत, असे खात्याच्या सूत्रांनी सांगितले. डोसची बाटली उघडल्यानंतर ते डोस तातडीने देऊन संपवायचे असते. ते जर उरले तर वाया जाण्याचा धोका असतो. गोव्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी नमूद केले. ते वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी झालेले केंद्र निहाय लसीकरण
- रविवारी राज्यभरातील लसीकरण 8189 जण
- पंचायत क्षेत्रात 4341 जण
- सरकारी-खासगी इस्पितळांमध्ये 3848 जण
- पिळर्ण पंचायत 338
- पेन्ह दी फ्रान्स 312
- सुकुर 270
- पीर्ण 237
- ठाणे 297
- नगरगाव 307
- नास्नोळा 181
- मोरजी 297
- नार्वे 168
- ओशेल 218
- मेरशी 452
- कोरगाव 242
- पाळी 340
- मेणकुरे 163
- पैंगीण 300
- कुंभारजुवे 219