देशात आणि जगभर कोरोनाचे तांडव सुरू आहे. अशावेळी खरेतर उणीदुणी न काढता एकदिलाने, एकमताने या संकटाचा सामना केला पाहिजे. राजकीय पक्ष व त्यांचे राजकारण यांचा उबग यावा अशी स्थिती आहे. जगभर लसीकरण, संशोधन, मदत या संकटातही संधीचा शोध, परोपकार, मानवता, राष्ट्रप्रतिमा, देशभक्ती यावर चर्चा आणि पावले टाकली जात आहेत. आणि आपल्याकडे टूलकिट, वादळानंतरच्या पाहणी दौऱयाचे राजकारण आणि राज्यपाल नियुक्त बारा जागाचे राजकारण आणि कोण शहाणा यावरच वाद, वादंग, कोर्टबाजी सुरू आहे. कोरोना काळात जो खर्च होतो आहे त्याचा हिशोब आणि ऑडिट झालेले नाही पण जेव्हा होईल तेव्हा अनेकांचे हात आणि तोंडे बरबटलेली दिसतील हे वेगळे सांगायला नको आणि हेच नागरिकांचे खरे दुर्दैव आहे. जगभर भारताची नाचक्की करण्याची मोहीम राबवली जाते आहे. त्यासाठीचे टूलकिट आहे. टूलकिट म्हणजे राजकीय पक्ष आपल्या समर्थकांना पक्षाने काय करावे, काय करू नये हे गुपचूप शिकवत असलेली मोहीम. एखाद्या नेत्या विरोधात, देशा विरोधात, पक्षा विरोधात बदनामीचा रचलेला डाव, त्या संदर्भात केलेल्या सूचनांचा दस्तऐवज. दिल्लीत शेतकरी आंदोलन आणि लाल किल्ल्यासमोर करण्यात आलेली हिंस्त्र निदर्शने हा टूलकिटचा भाग होता, असा आरोप आहे. या आंदोलनावेळी सरकारकडून कठोर पाऊल उचलले गेले असते तर ‘लोकशाही खतरे मे हैं’ अशी हकाटी पिटायची योजना होती. अगदी अशीच योजना, महाकुंभमेळय़ातील गर्दी किंवा कोरोना महामारी या संदर्भात आखली गेली असा भाजपाकडून आरोप होतो आहे. निवडणूक हे युद्ध आहे आणि ते जिंकण्यासाठी विविध आयुधे वापरली जातात. टूलकिट हे असेच आयुध आहे. ते निषिद्ध मानले गेले आहे. देशभक्ती, मानवता आणि राष्ट्र हे निवडणूक आणि सत्ता यापेक्षा महत्त्वाचे आहे. यांचे भान ठेवले पाहिजे. सोशल मीडिया, फेक न्यूज, खोटे आरोप, बदनामी, निवडणूक सल्लागार अशा ज्या नवनवीन गोष्टी निवडणूक तंत्रात रूढ होत आहेत. त्यातूनच नवनवी शस्त्रे निर्माण होत असून ती वापरली जात आहेत. काँगेसने मोदी व भारत सरकार यांच्या बदनामीचे टूलकिट वापरून देशाची व पंतप्रधानांची बदनामी सुरू केली आहे असा भाजपाकडून आरोप होतो आहे. भाजपाने काही पुरावे देत या टूलकिटच्या चौकशीची व देशाच्या बदनामीची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. काही विदेशी दैनिकात आणि मीडियात देशाची व मोदींची प्रतिमा बदनाम करण्याचे योजनाबद्ध काम सुरू आहे. यामागे राजकारण तर आहेच पण हे राजकारण साधताना राष्ट्रकारण मोडीत निघत आहे याचे भान दुर्दैवाने कोणालाच उरलेले नाही. महाकुंभ मेळय़ातील साधुंचे स्नान, वर्तन, कोरोनाचे चित्र, लाखो साधू कोरोना नियम डावलून, डुबकी मारत आहेत. महाकुंभानंतर कोरोनाचा कहर झाला आहे. मृतदेह जाळायला स्मशानभूमी अपुरी आहे. नदीत मृतदेह सोडले जात आहेत. कोरोना आकडेवारी खोटी सांगितली जाते आहे. मोदी सरकार देश सांभाळायला कमी पडले आहे, असे एक ना दोन अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्यामागे राजकारण आहे हे लपून राहिलेले नाही. या साऱयाचा परिणाम राजकारणात थोडा फार होईल. अ ऐवजी कदाचित ब सत्तेवर येईल पण देशाचा, देशबांधवांचा यामध्ये किंचितही फायदा नाही. या बदनामीमुळे अर्थव्यवस्था व विदेशी गुंतवणूक अडचणीत येईल. जगभर उंचावत असलेली भारताची प्रतिमा मलिन होईल, पण याचे भान कोणालाच नाही आणि सर्वांनी एकत्र येऊन देशहिताचे काम करावे यासाठीचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. जे दिल्लीत तेच गल्लीत. अलीकडेच चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला आहे. त्याचे पंचनामे होण्यापूर्वीच नवीन चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला तडाखा देण्याची भीती आहे. मदत आणि बचाव कार्य याची तयारी केली जात आहे. पण संकटात संकट यामुळे मोठा त्रास होतो आहे. गेल्यावर्षी कोकण किनारपट्टीला जे वादळ झाले. त्यावेळी ज्या घोषणा झाल्या त्या हवेतच विरल्या. त्यातच यंदा पुन्हा चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला, गोव्याला तडाखा दिला आहे. केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र येथे किनारपट्टीला जोरदार वारा आणि पाऊस धिंगाणा करत होत्याचे नव्हते करून गेला. या संकटातही मदतीपेक्षा राजकारण जोरात सुरू आहे. पंतप्रधानांनी वादळाने नुकसान झालेल्या गुजरातची हवाई पाहणी केली. मात्र महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. गुजरातला 1000 कोटी मदत देऊ केली. गोवा, महाराष्ट्र, केरळकडे दुर्लक्ष केले अशी हाकाटी पिटली जाते आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादळानंतर केलेल्या पाहणी दौऱयाची तर चेष्टाच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनीही कोकण दौरा केला आहे. मुख्य गोष्ट आहे कोकणात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयाला, कोकणी माणसाला आधार व मदत देण्याची त्या संदर्भात कृती काहीच नाही पण, राजकारण जोरात आहे. राज्यपाल नियुक्त जागांसाठी मंत्रिमंडळाने 12 नावे सुचवली आहेत. राज्यपालांनी ही यादी गेले पाच सहा महिने अडवली आहे. आता उच्च न्यायालयाने या नियुक्त्या केव्हा करणार असे विचारले आहे. राज्यपाल नियुक्त्या असोत, लसीकरण असो, शंभर कोटींची वसुली असो अथवा दहावी, बारावी परीक्षा न्यायालयाला त्यात लक्ष घालावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टूलकिट असो वा आमदार नियुक्त्या सर्वानी भान ठेवून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली पाहिजे. देश, देशहित आणि देशबांधव यांना केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.
Previous Articleआयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
Next Article दहावी-बारावी परीक्षांबाबत लवकरच ‘निकाल’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.