ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे. मात्र, कोरोना बहुरूपी आहे, आपल्याला कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटवर लक्ष ठेवावे लागेल. उत्परिवर्तनानंतर ते किती त्रासदायक ठरेल, याचा तज्ज्ञ सतत अभ्यास करत असतात. प्रतिबंध आणि वेळेवर उपचार करणे खूप महत्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्येकडील राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला. या ऑनलाईन बैठकीत आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँडचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, हिल स्टेशन्स, बाजारात मास्क विना आणि प्रोटोकॉल शिवाय लोक गर्दी करत आहेत, त्यांना आवर घातला पाहिजे. अन्यथा संक्रमणाचा धोका वाढेल.
कोरोना चाचणी आणि उपचारांशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारून आपल्याला पुढे जावे लागेल. विशेषत: ऑक्सिजनवरील बालरोग सेवेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल. पीएम केअर्सच्या माध्यमातून देशात शेकडो नवीन ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. मंत्रिमंडळाने ही नुकतीच 23 हजार कोटी रुपयांच्या नव्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. ईशान्येकडील प्रत्येक राज्य पायाभूत आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी या पॅकेजद्वारे मजबूत केले जाईल, असेही ते म्हणाले.