वार्ताहर/ काकती
कोरोना महामारीला थोपविण्यासाठी काकतीत मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचे रोज घरातच पार पाडत असून यावर्षीही पवित्र रमजान महिना लॉकडाऊनमध्ये सापडल्याने पुन्हा रोजेसह नमाज पठणसुद्धा घरीच पूर्ण केले जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने 27 एप्रिलपासून 10 मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. यंदा रमजान व हिंदूंच्या नवीन वर्षाची सुरुवात 14 एप्रिल रोजी गुढी पाडव्यापासून सुरुवात झाली आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव मस्जिदमध्ये एकत्र येऊन नमाज तरविह पठण करून अल्लाकडे मानवाच्या सुख-समाधानासाठी दुवा मागतात. परंतु कोरोना संसर्गाचे गांभीर्य, कडक संचारबंदी असल्याने आणि कोरोनावर मात करून विजय मिळवायचा आहे. याकरिता यंदाही रमजान महिन्यात नमाज पठण मस्जीद अथवा सार्वजनिक ठिकाणी न एकत्र येता घरातूनच सुरू आहे. आपल्या नमाजाची वेळ कळविण्यासाठी मस्जिदीतून अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लीम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. मात्र यंदा अल्लाहू अकबरची अजान ऐकताच घरातच रोजे पठण करीत आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरिक्त या रमजान महिन्यात रात्री नमाजानंतर तराविह म्हणजे रात्रीची विशेष नमाज पूर्ण महिनाभर होते. या नमाजमध्ये रोज कुरणाचे पठण केले जाते.
या कोरोनाच्या दुसऱया लाटेत संसर्गाचा प्रभाव अधिक आहे. दिवसेंदिवस बांधितांची संख्या जिल्हय़ातही वाढतच आहे. गावात मस्जिद व दर्गा मिळून नऊ आहेत. तर पाच हजारहून अधिक लोकसंख्या मुस्लीम बांधवांची आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी कडक उन्हातही रोजे घरच्या घरी पठण करीत आहेत. यासाठी शासन व प्रशासनाचे सुद्धा खबरदारी घेऊन सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रम जनतेनी एकत्र येऊन साजरा न करता घरातच स्वप्रेरणेने साजरे करावेत, असे आवाहनही मुस्लीम बांधव करीत आहे.
रमजान हा महिना संयम, समर्पणाने देवाची प्रार्थना करण्याचा मानला जातो. प्रत्येक व्यक्ती आपला आत्मा अल्लाहच्या इबादेतच समर्पित करते. देवासाठी सर्व प्रकारच्या त्यागाची सक्ती होत नाही म्हणूनच आराम मिळविण्यासाठी या रमजान महिन्यात संपूर्ण उपवास केला जातो.
या महिन्यात सकाळी फजर नमाज, दुपारी जोहर नमाज, पठण करून 30 दिवस कुराणाचे पठण करतात. या महिन्यात तरावीची नमाज पठणाला खूप महत्त्व मानले जाते. यावेळी वर्षभरातील मिळकतीवर अडीच टक्के जकात काढून गोरगरिबांना वाटप करतात. अनाथ, विकलांग, विधवा महिला व गरजूंना दानधर्म करून पुण्याचे कार्य पार पाडतात.