रात्रीची संचारबंदी? : सार्वजनिक कार्यक्रम, शिमगोत्सव मिरवणुका अडचणीत : सरकारी यंत्रणेकडून कोणतीही दखल नाही
प्रतिनिधी / पणजी
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवा सरकार समोर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची पाळी पुन्हा सरकारवर येणार असून सायंकाळपासून सकाळीपर्यंत सर्वत्र संचारबंदी करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय राज्यातील सार्वजनिक शिमगोत्सव पुन्हा अडचणीत आला असून तीन ठिकाणी जाहीर केलेल्या मिरवणुका देखील रद्द होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी नव्याने 100 बाधित वाढले व 3 जण मृत्यूमुखी पडल्याने सरकारी यंत्रणा पुन्हा एकदा खडबडून जागी झाली आहे. सरकारने नगरपालिका निवडणुका जाहीर केल्या आहेत. कोरोनामुळेच या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या व आता कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
सरकारकडून अद्याप कडक पावले नाहीत
शेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याने महाराष्ट्र सरकारने अनेक कडक उपाययोजना आखल्या, अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले एवढेच नव्हे तर अनेक शहरांमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी तथा लॉकडाउन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱया नागरिकांची तपासणी अद्याप सुरु केलेली नाही. पर्यटन उद्योगावर परिणाम होईल म्हणून राज्य सरकारने कोणतीही धाडसी पावले उचललेली नाहीत.
शिमगोत्सव समित्याच माघार घेण्याच्या तयारीत
तथापि, सध्याची स्थिती पाहता राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत जाणारी आहे. त्यामुळे सरकारला आता पुन्हा एकदा काही कडक उपाययोजना आखाव्या लागतील. राज्यात तीन ठिकाणी आयोजित केलेला सरकारी पातळीवरील शिमगोत्सव रद्द होण्याची शक्यता आहे. आग्रहाने पणजीचे नाव शिमगोत्सवाच्या स्थळांमध्ये समावेश करुन घेतलेल्या पणजी शिमगोत्सव समिती देखील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे माघार घेण्याची शक्यता आहे. फोंडा शिमगोत्सव समितीनेही शिमगोत्सव कार्यक्रमात रस दाखविलेला नाही. राज्यातील रोमटामेळ पथकांनीही यावर्षी शिमगोत्सवासाठी फारशी तयारी सुरु केलेली नाही. या पार्श्वभूमीवर चित्ररथ उभारण्याचे कामही कित्येक संस्थांनी सुरु केलेले नाही.
दरम्यान, गोवा सरकारने रात्रीच्यावेळी संचारबंदीचा निर्णय घेतलेला नाही वा अन्य कठोर उपाय योजना घेतलेल्या नाहीत. अनेक जण अद्याप मास्कचा वापर करीत नाहीत व त्याची दखल कोणतीही सरकारी यंत्रणा घेत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्याही वाढीस जाण्याची शक्यता वाढली आहे.